Wednesday, 28 January 2009

तालिबानचे भाउबंद-2




तालिबानचे भाउबंद-1

कर्नाटकातील मंगलोरमधील एका पबमध्ये श्रीराम सेना नावाच्या एका संघटनेने शनिवारी जो हैदोस घातला, तो पाहता भारतातही तालिबानींचे अवतार जन्माला येऊ लागल्याचे स्पष्ट झाले आहे. धर्माच्या संरक्षणाच्या नावाखाली लोकांवर निर्बंध घालायचे आणि ते न पाळणाऱ्यांना मारहाण करायची, प्रसंगी मुलींचा विनयभंग करायचा, असे प्रकार करणाऱ्यांना सहिष्णू आणि पुरोगामी भारतीय समाज थारा देणार नाही. पण दहशत निर्माण करून असे प्रकार सुरू झाले की समाजच घाबरून जातो. त्यामुळे या धामिर्क अतिरेकी प्रवृत्तींना सरकार नावाच्या यंत्रणेनेच पायबंद घालायला हवा.
मंगलोरमधील घटनेचा कर्नाटक सरकारने आणि भारतीय जनता पक्षाने निषेध केला असला तरी या प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी कठोर कारवाई करायला हवी. पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे. मात्र पबमध्ये एकत्र येऊन हैदोस घालण्यात आल्याने संघटित गुन्हेगारीच्या कायद्याखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवेत. तसे केले तरच त्या संघटनेवर कारवाई करणे शक्य होईल. अफगाणिस्तानमध्ये आणि पाकिस्तानच्या काही भागात तालिबानी मंडळींनी गोंधळ घातला आहे. मुस्लिम मुलींनी शिक्षण घेऊ नये, मुलांनी केवळ लष्करी शिक्षण घ्यावे, पुरुषांनी मानवी बॉम्ब बनावे, स्त्रियांनी कायम पडद्याआड राहावे, स्त्रीने मनात प्रेमाची भावना ठेवू नये, घराबाहेर एकट्याने पडू नये, आपल्या नवऱ्याबरोबर बाहेर पडतानाही गळ्यात तालिबानी परवाना घालावा, पुरुषांनी दाढी काढू नये, पायजमा थेट पायापर्यंत येऊ देऊ नये, असे त्यांचे फर्मान आहे. गेल्याच आठवड्यात पायघोळ पायजमा घातलेल्या एका शिक्षकाची तालिबानी मंडळींनी हत्या केली. तालिबानींच्या या अतिरेकाला सर्वसामान्य मुस्लिम जनताही कंटाळून गेली असली तरी त्यांच्या दहशतीमुळे गप्प आहे. हिंदू समाजात गेल्या काही वर्षांमध्ये अशा अतिरेकी प्रवृत्ती निर्माण झाल्या आहेत आणि या प्रवृत्तीही देशाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे दहशतवाद निर्माण करू लागल्या आहेत. हिंदू धर्माच्या संरक्षणाचे काम आपल्याच शिरावर आहे आणि त्यामुळे सर्व हिंदूंनी आपले ऐकायलाच हवे, अशी त्यांची भूमिका असते. तालिबानीसुद्धा हीच भूमिका घेत असतात.
ख्रिस्ती मिशनऱ्यांबद्दल तक्रारी असल्या तर कायद्याने कारवाई करणे शक्य आहे. मात्र या प्रवृत्ती मारहाणीचा वा प्रसंगी ठार मारण्याचा मार्ग अवलंबू लागल्या आहेत. तरुण मुलींनी जीन्स, फ्रॉक वा स्कर्ट घालू नयेत, साड्याच नेसाव्यात, असे म्हणणारी ही मंडळी कोणत्या युगात राहतात, कोणास ठाऊक. एकीकडे स्त्री ही मातेसमान आहे, असे म्हणायचे आणि मुलींना मारहाण करत त्यांचे कपडे फाडायचे, हे हिंदूच नव्हे, तर कोणत्याच धर्मात बसू शकत नाही. पण मर्यादापुरुषोत्तम श्ाीरामांच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्या 'कार्यर्कत्यां'नी मंगलोरच्या पबमध्ये नेमके हेच केले. त्याचा करावा तितका निषेध कमीच आहे. हा धुडगूस घालताना 'जय श्ाीराम', 'बजरंग बली की जय' अशा घोषणा देणे यामुळेच हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या प्रकारामुळे तिथे गेलेल्या अनेक तरुणींना मोठा मानसिक धक्का बसला असून, त्यातून बाहेर पडायला बराच वेळ लागेल. याच संघटनेच्या काही कार्यर्कत्यांनी शनिवारी रात्री एका घरात घुसून तिथे चाललेली पाटीर्ही उधळून लावली. एवढे सारे झाल्यावर या संघटनेच्या प्रमुखाने त्याचे समर्थन केले. तोकडे कपडे घालून चालणारा नंगानाच आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा त्याने दिला आहे. पण धर्माच्या नावावर इतरांच्या आयुष्याशी खेळण्याचा वा दुसऱ्यांवर नैतिकता लादण्याचा अधिकार या संघटनेला नाही. एखादे वर्तन समाजहिताला बाधक असेल, तर त्याला आळा घालण्यासाठी कायदे आहेत. त्यांचाच आश्ाय घेतला गेला पाहिजे.
मंगलोरनंतर कर्नाटकमधील अन्य शहरांत आणि मग इतर राज्यांतही हे लोण पसरू शकेल. तसे होणार नाही, याची काळजी शासन आणि पोलिसांनी घ्यायला हवी. त्यासाठी अशा संघटना आणि त्यांचे नेते यांच्यावरच बंधने आणणे आवश्यक आहे. केंद सरकार आणि राष्ट्रीय महिला आयोग यांनी मंगलोरमधील प्रकारांची गंभीर दखल घेतली आहेच. पण समाजानेही भीती न बाळगता भारतातील तालिबानी प्रवृत्तींचे आदेश, फर्मान वा ते घालू पाहत असलेले निर्बंध उधळून लावायला हवेत. पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय ब्राह्माण संमेलनातही ब्राह्माणांनी जानवे आणि धोतर घातलेच पाहिजे, स्नानसंध्या करायलाच हवी, स्त्रियांनी साडीच नेसायला हवी, अशी भूमिका मांडली गेली. हे सर्व न करताही एखादी व्यक्ती ब्राह्माण असू शकते, असे मांडणाऱ्या लेखिकेस जबरदस्तीने माफी मागायला लावण्यात आली. अशा प्रकारची वैचारिक असहिष्णुता समाजाच्या हिताची नाही. स्वत:ला प्रगत मानणाऱ्या वर्गाने तरी यापासून दूर राहिले पाहिजे.

Thursday, 22 January 2009

आरक्षणासाठी 'करो या मरो'


मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी 'करो या मरो' आंदोलनास प्रारंभ करण्याचा निर्धार गुरुवारी झालेल्या मराठा आरक्षण समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. एक फेब्रुवारीपर्यंत निर्णय न घेतल्यास १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी शिवनेरी आणि रायगडावर मंत्र्यांना पाय ठेऊन न देण्याचे ठरवण्यात आले असल्याचे मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी सांगितले.


समितीची बैठक पुण्यात झाली. या बैठकीला खेडेकर, समितीचे अध्यक्ष शशिकांत पवार, मराठा महासंघाचे अध्यक्ष अंकुश पाटील, सरचिटणीस राजेंद कोंढरे आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण गायकवाड उपस्थित होते. एक फेब्रुवारीपर्यंत सरकारने निर्णय घ्यावा. १५ फेब्रुवारीपूवीर् आरक्षण मिळाले नाही, तर बीड येथे होणाऱ्या महामेळाव्यात राजकीय हत्या की आत्महत्या करायची, हे ठरवण्यात येणार असल्याचे खेडेकर यांनी स्पष्ट केले. ओबीसींचे आरक्षण काढायचे नाही, तर मराठा समाजाला आरक्षण हवे आहे. मात्र, ते निवडणुकीत उमेदवारांना पाडण्याचे बोलत असतील, तर आम्हीही पाडू शकतो, असे आव्हान खेडेकर यांनी दिले. राज्यातील ९० आमदारांचा उघड पाठिंबा आहे. त्यांच्यासह १३२ आमदार पाठिशी असल्याचा दावा खेडेकर यांनी केला.

Wednesday, 21 January 2009

जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांचं आंदोलन











देशद्रोहाचा भयानक कट

हिंदू राष्ट्राचं निर्वासित सरकार निर्माण करण्याची पूर्ण योजना लेफ्टनंट कर्नल पुरोहितकडे होती. तसंच सोनेरी किनार असलेला भगवा झेंडा त्यानं तयार केला होता. एवढंच नव्हे तर हिंदू राष्ट्रासाठी इस्त्रायल, नेपाळ आणि थायलंड देशातून मदत मागितली होती. दोन वर्ष या कटाची तयारी सुरू होती. पण मालेगाव बॉम्बस्फोटात पुरोहित आणि पांडे पोलिसांच्या हाती लागले. आणि देशद्रोहाचा भयानक कट उघड झाला.लेफ्टनंट कर्नल पुरोहितनं टीम चांगली तयार केली होती. जम्मूच्या शारदा पीठाचा शंकराचार्य नाव स्वामी अमृतानंद उर्फ सुधाकर द्विवेदी उर्फ दयानंद पांडे, एक साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर, रिटायर्ड मेजर रमेश उपाध्याय आणि सोबत होते अभिनव भारत संघटनेचे कार्यकर्ते. काही संघ परिवाराचे कार्यकर्ते त्यांना बनवायचं होतं समांतर सरकार. सरकारमध्ये कुठली खाती असावीत याचाही आराखडा तयार होता. यासाठी होत होत्या बैठकावर बैठका. समांतर सरकारमध्ये अर्थ मंत्रालय, सामान्य प्रशासन, माहिती आणि प्रचार खातं, कायदा आणि सुव्यवस्था आणि परराष्ट्र मंत्रालय अशी खाती असतील याची चर्चा बैठकीत केली गेली. सरकारमध्ये संरक्षणमंत्र्याला नाव दिलं युद्धमंत्री. एक कोटी सैनिक असलेलं सैन्य उभारण्याची योजना आखली गेली. यासर्वांवर धर्माचा अंकुश असेल असं ठरवण्यात आलं. एवढंच नाहीतर सत्तेत असलेल्या सरकारला पाडण्यासाठी परकीय देशांच्या मदतीची तयारीही पुरोहितनं केली होती. इस्त्रायल आणि नेपाळ या देशांच्या संपर्कात कर्नल पुरोहित होता. संयुक्त राष्ट्रात देशाला हिंदू राष्ट्र म्हणून समर्थन मिळवणं, ट्रेनिंग आणि शस्त्रसाठा, राजकीय मान्यता यासारख्या अनेक बाबींवर या बैठकित चर्चा करण्यात आली. तसंच नेपाळकडून अभिनव भारतच्या कार्यकर्त्यांना ट्रेनिंग मिळावं याची बोलणीही करण्यात आली होती. म्हणजेच देशातील एक लष्करी अधिकारी आपल्याच देशातील सरकार आणि राज्यघटनेला संपवण्यासाठी परदेशाची मदत घेत होता. अभिनव भारत या संघटनेचा राज्यघटनेवर विश्वास नव्हता त्यामुळेच एक सेंट्रल हिंदू सरकार बनवायचं ठरलं.
ही संघटना तीन स्थरांवर काम करणार होती.आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राजकीय या तीन स्थरांवर. परकीय देशाच्या मदतीनं देशाच्या सीमांवर ताबा मिळवणं आणि सरकार स्थापन करणं.अभिनव भारतचा सर्वेसर्वा कर्नल पुरोहित याला 2024 पर्यंत देशाला हिंदू राष्ट्र बनवायचं होतं. देशाच्या सुरक्षा यंत्रणेतील भोकं कर्नल पुरोहितला चांगल्या प्रकारे माहित होत्या. याच्याच फायदा घेऊन त्यानं बॉम्बस्फोटाचा कट रचला. आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोहचावं याकरता एक न्यूज चॅनल उघडण्याचा विचारही कर्नल पुरोहितचा होता. मात्र नंतर एक मीडिया कॉलेज चालवण्याचा निर्णय घेतला गेला. अभिनव भारतनं प्रशिक्षण दिलेले 25 ते 26 विद्यार्थी दिल्लीत अनेक न्यूज चॅनलमध्ये काम करत आहेत.

जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांचं आंदोलन


जिजाऊ ब्रिगेडच्या 23 महिलांनी सांस्कृतिक मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मुंबईतल्या घरात कोंडून घेतलंय. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी हे आंदोलन केलं आहे. याबाबत जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा जयश्री शेळके सांगतात, 19 तारखेपासून जिजाऊ ब्रिगेडचं आंदोलन मुंबईतल्या आझाद मैदानात चालू आहे. महाराष्ट्रातील हजारो महिला या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. तरी अजूनही या आंदोलनकर्त्यांच्या मागण्या काय आहेत हे विचारायला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वा एकही मंत्री आला नाही. आपलं घरदार सोडून संपूर्ण महाराष्ट्रातून या महिला आलेल्या आहेत. कुणीच आपली दखल घेत नाही म्हणून या महिलांच्या सहनशक्तीचा अंत झाला आणि म्हणूनच त्यांनी मंत्र्याच्या घरात कोंडून घेतलं. आता जो पर्यंत मुख्यमंत्री मराठा आरक्षणाबाबत निर्णय जाहीर करत नाही तो पर्यंत आम्ही घरातून बाहेर येणार नाही असं त्यांनी सांगितलं. घरातील कोणत्याही वस्तूंची नासधूस करण्याचा आमचा उद्देश नाही असं त्या म्हणाल्या. ज्या 23 महिलांनी हर्षवर्धन पाटलांच्या घरात कोंडून घेतलं आहे त्या जिजाऊ ब्रिगेडच्या महाराष्ट्रातील महिला पदाधिकारी आहेत.