इतिहास बदलतो की तसाच राहतो? इतिहास कोण लिहितं आणि कोण बदलतं? प्रश्न गूढ आहेत. ते पुन: पुन्हा विचारले जातात आणि वादाला तोंड फोडतात. दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचा उल्लेख गाळून ते उत्तम प्रशासक होते, असा बदल इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात यावषीर् केला गेल्यानंतर अशाच एका वादाला तोंड फुटलंय आणि काही जातीय संघटनांच्या दबावाला सरकार बळी पडल्याचा आरोप करीत काही राजकीय पक्षांनी वातावरण तापवलंय. वस्तुस्थिती काय आहे?
गेल्या वषीर् पुण्याच्या सचिन गोडांबे या कम्प्युटर इंजिनीयर तरुणाने माहितीच्या अधिकाराखाली सरकारकडे एक पत्र पाठवून विचारणा केली होती की, शालेय पाठ्यपुस्तकातील धड्यात दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू होते, असं जे लिहिलेलं आहे त्याला कोणता ऐतिहासिक आधार आहे? त्यावर शिक्षण मंडळाने असं कळवलं होतं की, हा उल्लेख ३७ वर्षांपूवीर्चा असून त्यावेळी कोणता पुरावा लेखकाने वापरला होता याची कल्पना नाही व आता तसा पुरावा देता येत नाही. त्यावर गोडांबेंनी कळवलं की, सरकारकडे पुरावा नसेल तर हा उल्लेख काढून टाकावा. मग सरकारने याबाबतची ऐतिहासिक सत्यता पडताळून पाहण्यासाठी इतिहास संशोधक आणि अभ्यासकांची एक समिती नेमली. या समितीने दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरू नव्हते असा निर्वाळा दिला. प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ. जयसिंग पवार हे या समितीचे एक सदस्य होते.
डॉ. पवार यांच्या म्हणण्याप्रमाणे, ''परमानंदकृत 'शिवभारत' या शिवचरित्राच्या रूपाने अत्यंत विश्वसनीय पुरावा उपलब्ध आहे. आणि तो नव्याने वगैरे सापडलेला नाही, तो जुनाच आहे. परमानंद हे शहाजी राजांच्या पदरी होते. ते पुणेप्रांती आल्यावर शिवाजी महाराजांनी त्यांना स्वत:चं चरित्र लिहिण्याची आज्ञा केली. ती शिरसावंद्य मानून परमानंदांनी शिवरायांच्या बरोबर राहून त्यांचं चरित्र लिहिलं. शिवबांना वयाच्या बाराव्या वषीर् जिजामातेसह शहाजी राजांनी बेंगळुरूहून पुणेप्रांती पाठवलं तेव्हा त्यांच्याबरोबर हत्ती, घोडे, पायदळ, मुबलक खजिना अशा गोष्टींबरोबरच काही निष्णात अध्यापकही पाठवल्याचा उल्लेख या 'शिवभारता'त आहे, पण त्यात कुठेही दादोजी कोंडदेवांचं नाव नाही. संपूर्ण 'शिवभारता'त दादोजींचं नाव नाही. १६३० ते १६४७ या शिवरायांच्या जडणघडणीच्या काळात दादोजी कोंडदेवांचा उल्लेख कुठेही सापडत नाही. 'सभासदाची बखर' ही शिवकालीन एकमेव बखर. तिच्यातही दादोजींचा शिवरायांचे गुरू म्हणून उल्लेख नाही. ज्या बखरींमध्ये असे उल्लेख आहेत त्या शिवाजी महाराजांच्या कालखंडानंतर पुढच्या दीडशे वर्षांत लिहिल्या गेल्या आहेत. एवढंच नव्हे तर शिवकाळातली आदिलशहाची जी फर्मानं आहेत त्यात दादोजी कोंडदेवांचा उल्लेख 'मुतालिक' (कारभारी) असाच आहे.''
'शिवभारत'च्या उपलब्ध दोन प्रतींपैकी स. मा. जोशी यांनी तयार केलेली प्रत १९२७ सालीच प्रसिद्ध झाली होती. म्हणजे हा पुरावा ८० वर्षांपूवीर्च उपलब्ध होता. पण तो दुर्लक्षित करून ३७ वर्षांपूवीर्, दादोजी कोंडदेवांचा शिवरायांचे गुरू म्हणून उल्लेख पाठ्यपुस्तकात करण्यात आला, तेव्हा त्यालाही काही पुरावा असू शकेल. भावनांचं राजकारण करणारे राजकारणी आणि आंदोलक यांनी हा वाद नाहक चिघळवण्यापेक्षा, तो पुरावा गोळा करणंच अधिक शहाणपणाचं ठरणार नाही काय? इतिहासाचं गूढ पुराव्यांनी उकलायचं असतं, अस्मिता आणि भावनांनी नव्हे
1 comment:
apratim lekh aahe.
i really i like it. kahi lokanchya swarthi pana var prakash taknar aahe.
Post a Comment