Wednesday 14 July 2010

स्थानिक सापाला आपण ओळखले पाहिजे - डॉ. पवार

नांदेड - जेम्स लेनच्या तोंडून जे वदवायचे होते ते येथील काही गद्दारांनी वदवून घेतले. त्यामुळे जेम्स लेनच्या आधी अशा गद्दारांचा निषेध केला पाहिजे. राष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या राजमाता जिजाऊंचा व छत्रपती शिवरायांचा अवमान करणारा जेम्स लेन हा राष्ट्रीय गुन्हेगार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी मंगळवारी (ता. 13) केले.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित इतिहास संशोधक परिषदेत ते बोलत होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे न्यायमूर्ती भीमराव नरवाडे पाटील व जी. व्ही. थेटे होते.

श्री. पवार म्हणाले, की इयत्ता चौथीचे इतिहासाचे पुस्तक आणि बाबासाहेब पुरंदरे यांचे पुस्तक वाचण्याची गरज आहे. जेम्स लेनने गावगप्पांच्या आधारे केलेले लेखन हे कधीही इतिहासाच्या पात्रतेचे होऊ शकत नाही. जेम्स लेन नावाचा खरा साप गरळ ओकून देशातून निघून गेला. याला मदत करणाऱ्या स्थानिक सापाला आपण ओळखले पाहिजे. यासाठी प्रत्येकाने जागरूक राहणे आवश्‍यक आहे. राष्ट्रपुरुषांची बदनामी करणाऱ्याविरुद्ध कडक कायदा करण्याची घोषणा केल्याबद्दल श्री. पवार यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे आभार मानले.

मराठवाडा मेडिकल फाउंडेशन ट्रस्टतर्फे आयोजित डॉ. शंकरराव चव्हाण व्याख्यानमालेत "शिवछत्रपती ः स्वराज्याची संकल्पना' या विषयावर बोलताना डॉ. पवार पुढे म्हणाले, की शाहू महाराज, छत्रपतींची अनेक धोरणे डॉ. शंकरराव चव्हाण यांनी त्यांच्या काळात राबवून हरित क्रांतीचे स्वप्न पूर्ण केले; तसेच शाहू महाराजांचे लोकाभिमुख धोरण महाराष्ट्र शासन राबवीत आहे. शिवाजी महाराजांनी तुम्हा-आम्हाला सांस्कृतिक चेहरा दिला. मराठ्यांना स्वत:ची ओळख देणारा हा पहिलाच क्रांतिकारक असून, लोकशाहीचा पाया हा धर्मनिरपेक्ष आहे, असे प्रतिपादन डॉ. पवार यांनी केले.

छत्रपतीचे लोकाभिमुख ग्रंथ मराठी भाषेतच नाही, तर राज्यात बाहेरील 16 भाषांमध्ये प्रकाशित होणार आहेत. शाहू महाराजांचे ग्रंथ एकूण पाच भाषांत प्रकाशित करण्यासाठीच्या प्रकल्पाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एकरकमी 26 लाख रुपये दिले त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचेही आभार मानले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवानी टापरे या विद्यार्थिनीने स्वागतगीत सादर केले. डॉ. तेजस्विनी वाडेकर यांनी प्रास्ताविक केले.

कुलगुरू डॉ. निमसे म्हणाले, की शिवछत्रपतींचा दूरदर्शीपणा त्यांच्या नंतरच्या राज्यकर्त्यांनी दाखविला असता व तंत्रज्ञानाचा अवलंब केला असता तर भारताची औद्योगिक क्रांतीची संधी हुकली नसती. डॉ. सुरेश सावंत यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.