Thursday 23 September 2010

खरा जेम्स लेन बाबा पुरंदरेची कोर्टात भांबेरी उडाली

सुधाकर लाड यांनी लिहिलेल्या " छत्रपति शिवाजी, बाबा पुरंदरे आणि सत्य इतिहास" या पुस्तकामुळे अब्रू नुकसानी झाल्या बद्दल बाबा पुरंदरे यानी सुधाकर लाड यांच्या विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा केला आहे. पण सतत बाबा पुरंदरे गैर हजार राहीले.
दि. ६ एप्रिल २०१० ते हजार झाले तेंव्हा लाड यांचे वकील अनंत दारवटकर यांनी बाबा पुरंदरेची उलट तपासणी केली असता पुरंदरे यांना उत्तरे देता आली नाहीत.

दारवटकर यांनी शहाजी राजे यांची जन्म तारीख विचारली असता पुरंदरे यांना तिथी सांगता आली नाही जे तिथी नुसार शिव-जयंती म्हणून सारखे ओरडत असतात त्यांना शहाजी राजे यांची तिथी नुसार जयंती सांगता आली नाही हे विशेष आणि हे शिव चरित्राचे थोर आभ्यासक.


शिवाय छत्रपति शिवाजी राजे- जिजाऊ मा साहेब स्वराज स्थापणेसाठी महाराष्ट्रात आल्या नंतर शहाजी राजे व शिवाजी राजे हे १६६०-६१ पर्यंत भेटले नाहीत असे जे पुरंदरे वारंवार सांगत सुटतात, राजा शिवछत्रपति या पुस्तकात पण त्यांनी असे लिहिले आहे ते उलट तपासणीत चुकीचे आहे ते उघड झाले.

९ सप्टेंबर-
या ऐतिहासिक दाव्याच्या दि. ९ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळी प्रतिवादी सुधाकर लाड यांचे वकील सुप्रसिद्ध इतिहास संशोधक अनंत दारवटकर यांनी ब मो. पुरंदरे यांची जोरदार उलट तपासणी घेतली असता ब मो पुरंदरे निरुत्तर झाले.
मराठा जहागीरदार, सरदारांना स्वाभिमान नाही, कुळाशिळाची चाड नाही, बेअब्रूची चीड नाही, हे लाचार, स्वार्थी, गुलाम पुरुष मोठेपणासाठी स्वत:ची आई सुद्धा विकायला कमी करणार नाहीत............(- ब. मो. पुरंदरे , राजा शिव छत्रपती पा. ८३ , जुनी आवृत्ती )हे अनंत दारवटकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. ब. मो. पुरंदरे यांना कोणत्या मराठ्याने स्वत:ची आई विकून मोठेपणा मिरवला आहे, असे एखादे उदाहरण तुम्ही सांगू शकाल का? असा प्रश्न अनंत दारवटकर यांनी विचारला. या प्रश्नाने घायाळ, निरुत्तर झालेले ब. मो. पुरंदरे सारावा- सारव करीत तसे उदाहरण नाही पण मराठ्यांची तशी वृत्ती आहे , असे म्हणाले .
जेम्स लेन चे " शिवाजी: हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया" हे पुस्तक २००३ साली प्रसिद्ध झाल्यावर पुण्यातील काही मंडळीनी जेम्स लेनच्या निषेधार्थ पुण्यात सभा घेतल्या होत्या, तशी एखादी निषेधाची सभा तुम्ही घेतली होती का? असा प्रश्न अनंत दारवटकर यांनी ब मो पुरंदरे यांना विचारला असता तशी सभा घेतली नाही असे ब मो पुरंदरे म्हणाले.

या दाव्याची पुढील सुनावणी ५ ऑक्टोंबर रोजी होणार आहे.

ह्या शिवाय ब मो पुरंदरे यांनी जेम्स लेन प्रकरणात कोणावर कोर्टात एकही दावा केलेला नाही. पण इथे सुधाकर लाड यांनी लिहिलेल्या " छत्रपति शिवाजी, बाबा पुरंदरे आणि सत्य इतिहास" या पुस्तकामुळे अब्रू नुकसानी झाल्या बद्दल बाबा पुरंदरे यानी सुधाकर लाड यांच्या विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा केला आहे. पुरंदरे यांचे शिवाजी महाराजांवर किती खरे प्रेम आहे ते दिसूनच येत आहे.

Wednesday 11 August 2010

दहशतवादाला धर्म नसतो

भारताच्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी प्रतिमेला आणि एकात्मतेला हिदुत्ववादी दहशतवादी गटाच्या कृत्यांमुळे धोका निर्माण झाला असून त्यांच्यामुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण पसरले आहे. केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आपल्या खात्याचा जुलै महिन्याचा अहवाल सादर करताना स्पष्ट केले की समझोता एक्सप्रेसवर झालेल्या हल्ल्याची चौकशी राष्ट्रीय सुरक्षा संघटनेमार्फत करण्यात येईल व त्या हल्ल्यामागील कटाचा शोध घेण्यात येईल. त्याचबरोबर मालेगावमधील ८ सप्टेंबर २००६ चा दहशतवादी हल्ला, हैद्राबादच्या मक्का मशिदीवर १८ मे २००७ रोजी झालेला हल्ला आणि अजमेरच्या दर्ग्यावर ११ ऑक्टोबर २००७ रोजी झालेला हल्ला यांचाही शोध घेण्यात येईल. १८ फेब्रुवारी २००७ रोजी मध्यरात्री दिल्ली-लाहोर समझोता एक्स्प्रेसच्या दोन डब्यात बॉम्बस्फोट होऊन त्यात ६८ माणसे मृत्युमुखी पडली होती. मालेगाव येथील बॉम्बस्फोटानंतर महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाने ११ जणांना अटक केली. त्यात एक साध्वी आणि नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या एका माजी लष्करी कमांडरचा समावेश होता. ही पहिलीच घटना होती की जेव्हा भारतविरोधी दहशतवादी कृत्यात हिदुत्ववादी संघटनांशी संबंध असलेल्या व्यक्तींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर घडलेल्या दोन घटनांमध्ये देखील हिदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचे चौकशीअंती उघडकीस आले. सी.बी.आय. आणि राजस्थानच्या दहशतवादविरोधी पथकाने केलेल्या चौकशीत हे सत्य बाहेर आले. या सर्व स्फोटात सहभागी असलेल्या हिदुत्ववादी संघटनांचे धागेदोरे समझोता एक्स्प्रेसमधील बॉम्बस्फोटांशी जुळतात का हे तपासून पाहण्यात येत आहे.

चौकशीत सत्य उघडकीस आल्यावर हादरून गेलेल्या रा.स्व. संघाने नेहमीप्रमाणे खुलासा केला की ''हे सर्व लोक आणि संघटना या रा.स्व. संघाच्या सदस्य नाहीत.'' त्यानंतर रा.स्व. संघाचे प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनी पत्रकारांशी बोलताना अलिकडेच सांगितले, ''स्फोट घडवून आणणाऱ्यांनी रा.स्व. संघाकडून प्रेरणा घेतली असल्याची शक्यता आहे. पण त्यापैकी कुणीही रा.स्व. संघाचा स्वयंसेवक नव्हता.'' यात काही नवीन नाही. महात्मा गांधींच्या हत्येनंतर नाथुराम गोडसेबद्दल असेच सांगण्यात आले होते. पण गोडसेच्या भावाने एका मुलाखतीत स्पष्ट केले होते की त्यांच्या कुटुंबातील सगळे भाऊ हे रा.स्व. संघाचे स्वयंसेवक होते.काहींचे म्हणणे आहे की हिदू मूलतत्ववाद्यातील टोकाची भूमिका घेणारे काही घटक हिदुत्ववादी विषयांवर राजकीय तडजोड करण्याच्या कृत्यांना कंटाळून दहशतवादाचा आश्रय घेत असावेत. काही रा.स्व. संघाचे नेतेही मान्य करतात की काही वाट चुकलेले घटक हे दहशतवाद आणि हिसाचाराकडे वळले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्यामुळे सरसकट संघटनेवर दहशतवादी असल्याचा आरोप ठेवता येणार नाही! गांधी हत्या प्रकरणी झालेल्या खटल्याच्या वेळी रा.स्व. संघाने जी भूमिका घेतली होती तिची पुनरावृत्ती याहीवेळी होताना दिसली.

पण रा.स्व. संघाचा इतिहास बघितला आणि त्याची कार्यपद्धती बघितली तर संघाचे निष्ठावान आणि काठावरचे असा भेद नेहमीच करण्यात येत असल्याचे दिसते. हिदूंना लष्करी शिक्षण देणे आणि हिसाचाराचा राजकीय हत्यार म्हणून वापर करणे याबाबत रा.स्व. संघाचा दीर्घ इतिहास आहे. ''राजकारणाचे हिदूकरण करा आणि लष्करात हिदूपदपातशाही स्थापन करा'' असा मंत्र सावरकरांनी दिला होता. त्यापासून प्रेरणा घेऊन डॉ. बा.सि. मुंजे यांनी फॅसिस्ट हुकूमशहा मुसोलिनी यांची भेट घेण्यासाठी इटाली गाठली होती. रा.स्व. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार हे मुंजे यांना आदर्श मानीत होते. डॉ. मुंजे आणि मुसोलिनी यांची भेट १९ मार्च १९३१ रोजी झाली. डॉ. मुंजे यांच्या व्यक्तिगत दैनंदिनीतील २० मार्च १९३१ च्या नोंदीत इटालीयन फॅसिझममध्ये तरुणांना कसे लष्करी प्रशिक्षण देण्यात येते याविषयी प्रशंसात्मक मजकूर लिहिलेला आढळतो. इटालीहून भारतात परत आल्यावर डॉ. मुंजे यांनी नाशिक येथे सेन्ट्रल हिदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीची स्थापना १९३५ साली केली. त्याचे रूपांतर पुढे १९३७ साली भोसला मिलिटरी स्कूलमध्ये झाले. (याच संघटनेवर हिदुत्ववादी दहशतवादाचे प्रशिक्षण देण्याचा आरोप करण्यात येत आहे.) ज्यूंचे नाझी फॅसिस्टांनी जे शिरकाण केले त्याबद्दल १९३९ साली गोळवलकरांनी आनंद व्यक्त केला होता आणि म्हटले होते, ''या घटनेपासून हिदूंनी चांगला बोध घेण्याची आवश्यकता आहे.''

अलिकडेच बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर रा.स्व. संघाचे दोन हात समजल्या जाणाऱ्या बजरंग दल आणि विश्व हिदू परिषद यांनी कारसेवकांना योग्य प्रशिक्षण दिल्याबद्दल स्वत:ची पाठ थोपटून घेतली होती. तेव्हाचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणाले होते, ''बाबरी मशिदीचा विध्वंस करण्याचे काम कारसेवकांनी अत्यंत तडफेने पार पाडले याबद्दल मला अभिमान वाटतो. हे काम एखाद्या ठेकेदारालाही इतक्या चांगल्या तऱ्हेने करता आले नसते!'' रा.स्व. संघाशी अशी वैचारिक बांधिलकी असलेल्यांचा संताप अलिकडेच उफाळून आला आणि निरनिराळ्या ठिकाणी घडलेल्या दहशतवादी कृत्यात हिदू संघटनांचा सहभाग असल्याच्या चित्रफितींचे चॅनेलवरून प्रसारण केल्याबद्दल त्यांच्या कार्यकर्त्यांनी नॅशनल टेलिव्हिजन न्यूज चॅनेलच्या कार्यालयावर हल्ला चढवून तोडफोड केली. ज्या ध्वनिफिती ऐकविण्यात आल्या त्यात उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांना ठार मारण्याचा कट करण्यासंबंधीचे संभाषणही होते. फॅसिस्टांची आठवण करून देणाऱ्या अशा असहिष्णू कार्यकर्त्यांकडून होणारे दहशतवादी हल्ले या लोकांची वैचारिक बांधिलकी स्पष्ट करतात आणि त्यांच्या कृत्यांना प्रोत्साहन देणाऱ्या संघटनांचे स्वरूप स्पष्ट करतात.

'हिदू दहशतवाद' या शब्दाला आक्षेप घेताना रा.स्व. संघाचे सरसंघचालक म्हणतात, ''तुम्ही सगळ्या हिदू समाजाला दहशतवादाशी का जोडता? अशातऱ्हेचा शब्द निर्माण करणे हा रा.स्व. संघाची बदनामी करण्याचा कट आहे. हिदुत्ववादी शक्तींचा पराभव करण्याचा हा राजकीय कट आहे.'' पण आम्ही जो म्हणतो तो हिदुत्ववादी दहशतवाद आहे. हिदू दहशतवाद नव्हे! कोणत्याही धार्मिक समुदायाला दहशतवादी कृत्याबद्दल जबाबदार धरता येणार नाही. पण हाच युक्तिवाद अन्य धर्मासाठीही वापरला पाहिजे. पण रा.स्व. संघाला ते मान्य नाही. मालेगाव बॉम्बस्फोटाच्या संदर्भात झालेल्या अटकेपूर्वी ऑक्टोबर २००८ मध्ये रा.स्व. संघाच्या कार्यकारिणीची बैठक झाली होती. त्यात रा.स्व. संघाने केलेल्या ठरावात, ''इस्लामी दहशतवाद पोलादी हातांनी नियंत्रणात ठेवण्यात यावा'' असे म्हटले होते. हा केवळ दुटप्पीपणाच नाही तर आधुनिक धर्मनिरपेक्षतावादी भारतीय लोकशाहीचे रूपांतर रा.स्व. संघाच्या संकल्पनेनुसार 'हिदू राष्ट्रात' करण्याच्या संकल्पाचे मूळ कोणत्या वैचारिक स्थितीत गुंतले आहे ते स्पष्ट करणारे आहे. दहशतवादाला धर्म नसतो हे मी सातत्याने माझ्या स्तंभातून मांडत आलो आहे. ते केवळ राष्ट्रविरोधी कृत्य असते. त्याविषयी देशाने सहिष्णुता बाळगण्याचे कारण नाही, निरनिराळ्या पद्धतीचा दहशतवाद हा एकमेकांचे पोषण करीत असतो आणि देशाची एकात्मता नष्ट करण्याचा प्रयत्न करीत असतो. तेव्हा देशाच्या धर्मनिरपेक्ष लोकशाही आधाराचे रक्षण करण्यासाठी राजकीय हेतू साध्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विनाशक वैचारिक पद्धतींना पराभूत करण्याची गरज आहे.

Wednesday 14 July 2010

स्थानिक सापाला आपण ओळखले पाहिजे - डॉ. पवार

नांदेड - जेम्स लेनच्या तोंडून जे वदवायचे होते ते येथील काही गद्दारांनी वदवून घेतले. त्यामुळे जेम्स लेनच्या आधी अशा गद्दारांचा निषेध केला पाहिजे. राष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या राजमाता जिजाऊंचा व छत्रपती शिवरायांचा अवमान करणारा जेम्स लेन हा राष्ट्रीय गुन्हेगार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी मंगळवारी (ता. 13) केले.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित इतिहास संशोधक परिषदेत ते बोलत होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे न्यायमूर्ती भीमराव नरवाडे पाटील व जी. व्ही. थेटे होते.

श्री. पवार म्हणाले, की इयत्ता चौथीचे इतिहासाचे पुस्तक आणि बाबासाहेब पुरंदरे यांचे पुस्तक वाचण्याची गरज आहे. जेम्स लेनने गावगप्पांच्या आधारे केलेले लेखन हे कधीही इतिहासाच्या पात्रतेचे होऊ शकत नाही. जेम्स लेन नावाचा खरा साप गरळ ओकून देशातून निघून गेला. याला मदत करणाऱ्या स्थानिक सापाला आपण ओळखले पाहिजे. यासाठी प्रत्येकाने जागरूक राहणे आवश्‍यक आहे. राष्ट्रपुरुषांची बदनामी करणाऱ्याविरुद्ध कडक कायदा करण्याची घोषणा केल्याबद्दल श्री. पवार यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे आभार मानले.

मराठवाडा मेडिकल फाउंडेशन ट्रस्टतर्फे आयोजित डॉ. शंकरराव चव्हाण व्याख्यानमालेत "शिवछत्रपती ः स्वराज्याची संकल्पना' या विषयावर बोलताना डॉ. पवार पुढे म्हणाले, की शाहू महाराज, छत्रपतींची अनेक धोरणे डॉ. शंकरराव चव्हाण यांनी त्यांच्या काळात राबवून हरित क्रांतीचे स्वप्न पूर्ण केले; तसेच शाहू महाराजांचे लोकाभिमुख धोरण महाराष्ट्र शासन राबवीत आहे. शिवाजी महाराजांनी तुम्हा-आम्हाला सांस्कृतिक चेहरा दिला. मराठ्यांना स्वत:ची ओळख देणारा हा पहिलाच क्रांतिकारक असून, लोकशाहीचा पाया हा धर्मनिरपेक्ष आहे, असे प्रतिपादन डॉ. पवार यांनी केले.

छत्रपतीचे लोकाभिमुख ग्रंथ मराठी भाषेतच नाही, तर राज्यात बाहेरील 16 भाषांमध्ये प्रकाशित होणार आहेत. शाहू महाराजांचे ग्रंथ एकूण पाच भाषांत प्रकाशित करण्यासाठीच्या प्रकल्पाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एकरकमी 26 लाख रुपये दिले त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचेही आभार मानले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवानी टापरे या विद्यार्थिनीने स्वागतगीत सादर केले. डॉ. तेजस्विनी वाडेकर यांनी प्रास्ताविक केले.

कुलगुरू डॉ. निमसे म्हणाले, की शिवछत्रपतींचा दूरदर्शीपणा त्यांच्या नंतरच्या राज्यकर्त्यांनी दाखविला असता व तंत्रज्ञानाचा अवलंब केला असता तर भारताची औद्योगिक क्रांतीची संधी हुकली नसती. डॉ. सुरेश सावंत यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Thursday 24 June 2010

जाणता राजा शाहू महाराज


आधुनिक भारताचे भाग्यविधाते, आरक्षणाचे जनक यशवंत जयसिंगराव घाटगे म्हणजेच छत्रपती शाहू महाराज. २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर येथे त्यांचा जन्म झाला. शाहू महाराज नावाप्रमाणेच यशवंत राहिले. भारतमातेच्या पोटी अनेक थोरांनी, संतांनी, महंतांनी, राजांनी, महाराजांनी, समाज सुधारकांनी जन्म घेऊन भारतातील गोरगरीब दीन दुबळ्यांची मनोभावे सेवा केलेली आहे.

छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक बंधूभाव, समता, दलित, बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रीडा, आरोग्य इ. क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी त्यांनी खूप परीश्रम घेतले. समाजातील गोरगरीब, दीनदुबळे, मागासवर्गीय, उपेक्षित व आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांच्या सर्वागीण विकासाला प्राधान्य देणारे ते एकमेव राजे होते. सुरूवातीस कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा कायदा लागू केला. समता प्रस्थापित करण्याच्या ध्येयाने अस्पृश्यता निवारणाकरिता जातीभेद निर्मूलन बलुतेदारी पद्धतीवर बंदी आणली. स्त्री शिक्षण, देवदासी प्रथेचे उच्चाटन, महिला संरक्षण कायदा, विधवा पूनविर्वाह कायदा, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन यासारख्या परीवर्तनवादी मुद्दे प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचे धाडस त्यांनी केले व त्यांची अंमलबजावणी होते की नाही ते स्वत: खात्री करून घेत असत. स्त्री हक्क स्वातंत्र्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन पत्नीला त्रास देणाऱ्या पतीसाठी शिक्षेच्या कायद्याची तरतूद केली. अनिष्ठ रुढी परंपरा उच्चाटनासाठी प्रयत्न केले. १९१७ मध्ये विधवा पूनर्विवाह कायदा व विवाहनोंदणी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली.

बहुजन व मागासवर्गीय समाजातील मुला-मुलींना परिपूर्ण शिक्षण मिळाल्याशिवाय त्यांचा बौद्धिक, सामाजिक व आर्थिक विकास शक्य नाही हे महाराजांनी हेरले व ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावाला शाळांची निर्मिती केली व शिक्षण सक्तीचे केले, एवढे करून न थांबता त्यावरील शुल्क माफ केले. जे पालक आपल्या पाल्यांना रोज शाळेत पाठविणार नाही अशा पालकांना प्रतिमहिना एक रुपया दंड आकारण्याची कायदेशीर तरतुदही केली. तसेच त्यांनी वसतीगृहे उभे केलीत, गरिब विद्यार्थ्यांसाठी तर त्यांनी आपला राजवाडाच खुला केला. यामुळे बहुजन व दलित समाजातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना शिक्षणाचे दरवाजे खुले झालेत.

८ सप्टेंबर १९१७ रोजी सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा जाहिरनामा काढला. २१ मे १९१९ रोजी आर्थिक दृष्टय़ा दुर्बल विद्यार्थ्यांना फी माफीचा निर्णय घेतला. १ जानेवारी १९१९ रोजी आज्ञा देवून प्राथमिक शाळा व महाविद्यालयातील अस्पृश्य मुलांना स्पृश्य मुलांसारखीच समानतेची वागणूक द्यावी म्हणून शिक्षण खात्याला आदेश दिला. ३० सप्टेंबर १९१९ रोजी अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा बंद केल्यात. ६ जुलै १९०२ मागास जातींना नोकरीत ५० टक्के जागा राखीव ठेवण्याची घोषणा केली. २३ पेब्रुवारी १९१८ ला कुलकर्णी वतने बंद, तलाठी सुरू. आंतरजातीय विवाह कायदा १५ एप्रिल १९२० नाशिक येथे उदोजी मराठा विद्यार्थी वसतीगृहाचा कोनशिला समारंभ केला. १९ नोव्हेंबर १९२१ मध्ये रायगड येथे शिवस्मारकाचा पायाभरणी समारंभ प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते झाला. तसेच सिंधूदुर्ग जिल्ह्य़ातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा जिर्णोद्धार ही केला. १६ फेब्रुवारी १९२२ दिल्लीत भरलेल्या अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेचे ते अध्यक्ष होते.

राजर्षी शाहू महाराजांनी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, लिंगायत आदी सर्वच जातीतील-पंथातील विद्वान, पंडीत, शिक्षित, अशिक्षित, मल्ल, शिकारी, गायक, चित्रकार, शाहीर, कारागिर, तमासगीर या सर्वावर निव्र्याज भावनेने प्रेम करून त्यांना त्यांच्या विकासासाठी व उद्धारासाठी सर्वप्रकारची मदत देत. शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रृत आहे. डॉ. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ हे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ २५०० रुपयांची भरघोस मदत केली व त्यानंतर ‘मूकनायक’ साप्ताहिक पूर्ववत सुरु राहिले. २० मार्च १९२० रोजी करवीर राज्यातील ‘कागल’ जहागिरीतील ‘माणगांव’ या ठिकाणी अस्पृश्यांची पहिली ऐतिहाकि परिषद शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीतून व प्रेरणेने आयोजित केली होती. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब होते.

‘माझे राज्य गेले तरी बेहत्तर, अस्पृश्योद्धाराचे कार्य थांबविणार नाही’ महाराजांच्या अशा कार्यामुळे अस्पृश्य जनता शाहूंना आपला त्राता, उद्धारक, मित्रच नव्हे तर प्रत्यक्ष देव मानीत होते. ह्य़ामुळे महाराज व बाबासाहेब याचा स्नेह वाढत गेला.

करवीर राज्याचे उत्पन्न कमी असल्याने नोकरशाहीच्या हातून शाहू महाराजांनी सत्तासूत्रे आपल्या हाती घेऊन प्रशासन यंत्रणेवर वचक बसविण्यासाठी ‘हुजूर कार्यालयाची’ स्थापना केली. महाराजांची ही कृती म्हणजे नोकरशाहीच्या मक्तेदारीला लावलेला सुरूंगच होता. ‘कुस्तीची पंढरी’ कोल्हापूरला बनविण्याचे श्रेय हे केवळ राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनाच जाते. म्हणजे कोल्हापूरच्या मातीत ‘मल्लविद्या’ रुजविण्याचे, जोपासण्याचे व वाढविण्याचे काम त्यांनी केले. १८९५ साली ‘मोतीबाग तालीम’ची स्थापना केली. त्या ठिकाणी प्रवेशव्दारावर एक पाटीवर लिहीले होते. ‘पहिली शरीरसंपत्ती दुसरी पूत्रसंपत्ती व तिसरी धनसंपत्ती असेल तोच पुण्यवान’ म्हणजे महाराजांचे क्रिडा क्षेत्राविषयीची आस्था येथे दिसते. पुढे जाऊन ३१ जुलै १८९७ रोजी जेव्हा त्यांना पुत्ररत्न झाले. त्यावेळी त्यांनी एक जंगी स्पर्धा ठेवली होती. त्या स्पर्धेत देशभरातील सर्व मल्ल आले होते. असा हा महान कीर्तीवंत राजा राजर्षी शाहू महाराज ६ मे १९२२ ला अनंतात विलीन झाला. अशा थोर जाणता राजास मानाचा मुजरा.

Sunday 6 June 2010

तीर्थकुंडात लघुशंका करणाऱ्या बडव्याला शिक्षा

विठ्ठल मंदिरातील तीर्थकुंडात लघुशंका करणाऱ्या बडव्याला तीन महिने कैद

पंढरपूर, दि. ५ (प्रतिनिधी) - श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील तीर्थकुंडात लघुशंका करणाऱ्या गोपाळ बडवे (वय ५५, रा. बडवे गल्ली, पंढरपूर) याला येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी.डी. सुभेदार यांनी तीन महिन्यांची साधी कैद, १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

राज्याची आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपुरात १५ मे २००३ रोजी घडलेल्या या प्रकरणाने खळबळ उडाली होती. गोपाळ बडवे हा १५ मे २००३ रोजी मंदिरात झोपण्यासाठी आला होता. रात्री मंदिर बंद झाल्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे काही कर्मचारी स्वच्छतेची कामे करीत होते. रात्री १.२० वा. गोपाळ बडवे हा मंदिरातील गोमुख या तीर्थकुंडाजवळ लघुशंका करीत होता. मंदिर समितीचे कर्मचारी माणिक यादव यांनी हा प्रकार पाहिला. यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना बोलावून गोपाळ बडवेला ताब्यात घेतले. दुसऱ्या दिवशी या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली. वारकरी संप्रदायातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. विविध सामाजिक संघटनांनी निषेध करून गोपाळ बडवे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली.


यानंतर मंदिर समितीचे कर्मचारी बाळासाहेब माळी यांनी याप्रकरणाबाबत तत्कालीन प्रांताधिकारी आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीवरून रमेश चव्हाण यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गोपाळ बडवे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.


यानंतर पंढरपूर न्यायालयात खटला भरण्यात आला. न्यायालयात पाच जणांच्या साक्षी नोंदविल्या. तपासी अंमलदार आर.जे. कुलकर्णी यांच्या तपासातील बाबीही तपासण्यात आल्या. बचावासाठी सुधीर बडवे याने साक्ष दिली. सरकार पक्षातर्फे अॅड. दत्तात्रय नलावडे यांनी काम पाहिले. सरकार पक्षाचा युक्तिवाद विचारात घेऊन न्यायालयाने गोपाळ बडवे याला तीन महिने कैद तर १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.