Tuesday 15 December 2009

डॉ. जयसिंगराव पवार यांचे श्यामसुंदर मुळे यांना प्रत्युत्तर:

लोकप्रभात प्रसिध्द झालेल्या ‘चौथीची इतिहास बखर’ या श्यामसुंदर मुळे यांच्या लेखाला ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी दिलेले प्रत्युत्तर...

गेल्या जूनमध्ये बालभारतीने इयत्ता चौथी इतिहासाचे ‘शिवछत्रपती’ हे पाठय़पुस्तक प्रसिद्ध केले. त्यातील ‘शिवरायांचे शिक्षण’ या पाठात त्यांचे शिक्षण शहाजीराजे व जिजाबाई यांच्या देखरेखीखाली झाले आणि ते शहाजीराजांनी नेमलेल्या विख्यात शिक्षकांनी केले, अशी समकालीन पुराव्याच्या आधारावर इतिहासाची पुनर्माडणी केली होती. तथापि शिवरायांचे शिक्षण दादोजी कोंडदेवांनीच केले, असे मानणाऱ्या प्रस्थापित इतिहासाच्या कैवाऱ्यांनी या पुनर्माडणीविरुद्ध मोठे रान उठविले. त्यामध्ये पुस्तकात घातलेला नवा मजकूर बिनपुराव्याचा आहे, या आरोपापासून पुस्तकात दादोजींचे नावच वगळले आहे, त्यांना शिवरायांच्या गुरुपदावरून हटवले आहे. इथपर्यंत दादोजी समर्थकांनी मजल मारली. त्यापैकी अनेक जणांनी हे पुस्तकही पाहिले नव्हते.

वास्तविक जुन्या पुस्तकात कुठेही दादोजींचा उल्लेख शिवरायाचे ‘शिक्षक’ अथवा ‘गुरू’ म्हणून नव्हता. तेव्हा तो वगळण्याचा प्रश्नच नव्हता. पूर्वीच्या पुस्तकातील दादोजींचा शहाजीराजांना इमानी, न्यायी, एकनिष्ठ, कडक शिस्तीचा व चोख कारभार करणारा सेवक म्हणून असलेला उल्लेख जसाच्या तसा ठेवला होता. तथापि शिवरायांचे शिक्षण दादोजींच्या देखरेखीखाली झाले हा उल्लेख वगळून ते शहाजीराजे व जिजाबाईंच्या देखरेखीखाली झाले, असा बदल केल्यामुळे दादोजी समर्थकांनी एकच हलकल्लोळ माजविला.तेव्हा दादोजी समर्थकांच्या सर्व आक्षेपांचे पुराण्यानिशी खंडन करणारे तीन लेख मी २१ जून ०९ रोजी महाराष्ट्रातील प्रमुख दैनिकांत प्रसिद्ध केले. त्यानंतर या लेखांच्या विरोधात, माझ्या मुद्दय़ांचे खंडन करणारी कोणाचीही प्रतिक्रिया व्यक्त झाली नाही. परवाच्या ‘लोकप्रभा’त मात्र (दि. २७ नोव्हें.) श्यामसुंदर मुळे यांनी एक प्रदीर्घ लेख लिहून आपली प्रतिक्रिया बऱ्याच उशिरा का होईना दिली आहे. प्रस्तुतचा लेख त्यांच्या प्रतिक्रियेविषयी आहे.

मुळेंच्या लेखाचे उद्देश

मुळेंच्या लेखाचे दोन मुख्य उद्देश दिसतात. पहिला म्हणजे जयसिंगराव पवार यास ‘टारगेट’ करून त्यांनी चौथीच्या पुस्तकाची ‘बखर’ कशी केली आहे, हे सांगणे आणि दुसरा म्हणजे ज्या ‘शिवभारत’ या ग्रंथाच्या आधारे त्यांनी इतिहासाची पुनर्माडणी केली आहे, तो ग्रंथच कसा अधिकृत अतएव विश्वसनीय नाही, हे वाचकाच्या मनावर बिंबवणे.खरे तर दादोजी हे शिवरायांचे शिक्षक होते, अगर गुरू होते, हे सिद्ध करणे हे मुळेंचे तिसरे उद्दिष्ट असायला हवे होते, पण त्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या पुराव्यांची काहीही मांडणी केलेली नाही. शिवभारतासारख्या शिवकालातील ग्रंथाच्या कर्त्यांने म्हणजे कवींद्र परमानंदाने ‘दादोजी कोंडदेवाला अनुल्लेखाने मारल्या’ने आणि जयसिंगराव पवारांनी त्याच ग्रंथाच्या आधारावरून दादोजींना शिवरायांच्या शिक्षक पदावरून (की गुरुपदावरून?) हटविल्यामुळे ते ‘सखेदाश्चर्य’ व्यथित झाले आहेत. त्यांच्या प्रतिक्रियेचे खरे कारण हे होय.

ही कोण नीती?

प्रथमत: एक लक्षात घेतले पाहिजे की या पुस्तकासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीने त्याचे संपूर्ण पुनर्लेखन केलेले नाही. बालभारतीकडे गेली अनेक वर्षे या पुस्तकाविषयी ज्या तक्रारी व सूचना आल्या होत्या, त्यांचा विचार करून आवश्यक तो बदल करणे एवढेच समितीस अभिप्रेत होते. तसे पुनर्लेखन समितीने केले आहे. तथापि समितीने सर्वच पुस्तक लिहून काढले आहे, असे गृहीत धरून मुळे यांनी टीका केली आहे. उदा. शिवरायांचे सईबाईशी लग्न, बाजीप्रभूंचा पराक्रम इत्यादी.दादोजींच्या संदर्भात त्यांची प्रतिमा डागाळेल, असा कोणताही मजकूर आम्ही नव्याने घातलेला नाही. उलट त्यांची प्रतिमा मलिन करण्याची संधी देणारा जुन्या पुस्तकातील मजकूर आम्ही गाळला आहे. जुन्या पुस्तकात शिवरायांचा स्वराज्याचा उद्योग पाहून दादोजी म्हणतात, ‘‘राजे, सुलतानाचे बळ प्रचंड! त्यांच्याविरुद्ध तुम्ही उठाव करणार? तुम्ही लहान. तुमची शक्ती लहान. म्हणून भीती वाटते इतकेच!’’ दादोजींचा मुळातच शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीला विरोध होता, असे मत जे लोक मांडतात, त्यांना हा मजकूर पुष्टी देणारा ठरतो; त्यामुळे दादोजींची प्रतिमा नकळत मलिन होते, म्हणून तो मजकूर आम्ही नव्या पुस्तकात गाळला. याबद्दल एका शब्दानेही दादोजीसमर्थक समितीचे आभार मानत नाहीत; उलट दादोजींच्या कामगिरीचे महत्त्व सांगणारा परिच्छेद आम्ही ठेवला आहे, तो आमच्यावर ‘जातीयतेचा आरोप’ येऊ नये म्हणून ठेवला आहे, असा आरोप करतात, ही गोष्ट कोणत्या नीतीत बसते? ते कसे काय सिद्ध होते?

पण या किरकोळ गोष्टी आहेत. मुळे यांचा माझ्यावर सर्वात मोठा आक्षेप आहे तो मी दादोजींबद्दल माझे पूर्वीचे मत बदलेले म्हणून. माझे पूर्वीचे मत वाचकांना कळावे, यासाठी त्यांनी मी ३०-३२ वर्षांपूर्वी लिहिलेल्या माझ्या पुस्तकातील अनेक उतारे उद्धृत केले आहेत आणि गमतीची बाब अशी की, शेवटी त्यांनी एखादे ऐतिहासिक सत्य सापडल्याच्या आविर्भावात विचारले आहे, ‘‘वरील उताऱ्यांवरून दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे शिक्षक होते हे सिद्ध होत नाही काय?’’ते कसे काय सिद्ध होते? या उताऱ्यांवरून माझे पूर्वीचे मत आता बदलले आहे, हे स्पष्ट होईल. पण माझे हे मत तुमचा ऐतिहासिक पुरावा कसा होतो? एखाद्या लेखकाचे मत म्हणजे पुरावा नव्हे! ज्यांच्या आधारावर इतिहास रचला जातो, ती साधने म्हणजे पुरावा हा इतिहासशास्त्राचा साधा नियम आहे. आणि समजा माझे एके काळचे मत हाच तुमचा पुरावा ठरत असेल, तर आताचे माझे बदलेले मत तुमचा पुरावा का होत नाही? खरे तर कोणत्याही लेखकाचे सर्वात अलीकडचे मत ग्राह्य़ धरावयास हवे. पण मुळे तसे मानत नाहीत. कारण ते त्यांच्या विरोधात जाते.माझ्या पूर्वीच्या मताच्या संदर्भात मुळे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातील मुख्य म्हणजे ३०-३५ वर्षांपूर्वीही अनेक लोक दादोजी हे शिवरायांचे ‘गुरू’ नव्हते असे म्हणत असता त्यांच्या मताची दखल मी का घेतली नाही? पूर्वीचे मत बदलण्यास मला ३०-३२ वर्षांचा प्रदीर्घ कालावधी का लागला? (माझ्या जून ०९ मधील लेखांना उत्तरे द्यावयास मुळेंनी ५ महिने का घेतले, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो!) आता वादाकरिता आपण गृहीत धरू की मुळेंच्या प्रश्नांची उत्तरे मी त्यांना हवी तशी दिली आणि त्या सर्वाचा दोष मी स्वीकारला, तरी मूळ मुद्दा ‘दादोजी शिवरायांचे शिक्षक होते’, हा कसा काय सिद्ध होतो? मी माझे मत केव्हा बदलले हे महत्त्वाचे नाही, तर कोणत्या पुराव्यावरून बदलले हे महत्त्वाचे आहे.

मुळे यांचे अपूर्व धाडस

या संदर्भात मुळे यांच्या निदर्शनास आणू इच्छितो की त्यांनी माझ्यावर शरसंधान करण्यासाठी माझ्या जुन्या पुस्तकाचे आयुध वापरले आहे, ते गेल्या दीड-दोन वर्षांत अनेकांनी वापरून बोथट झालेले आहे. दादोजी कोंडदेव क्रीडा पुरस्कार आणि चौथी इतिहास यांच्या संदर्भात इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे, निनाद बेडेकर व पांडुरंग बलकवडे यांनी आपल्या मुलाखतीत व लेखांत माझ्या जुन्या पुस्तकातील उतारे उद्धृत केले होते आणि ‘पवारांना आताच कसा काय साक्षात्कार झाला?’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. पण यापैकी कुणीही माझे नवे मत ज्या शिवभारत ग्रंथावर आधारित आहे, त्या ग्रंथास ‘अनधिकृत’ अथवा ‘अविश्वसनीय’ म्हटलेले नाही. पण तसे म्हणण्याचे अपूर्व धाडस मुळे यांनी दाखवले आहे!मुळे यांनी याहून मोठे धाडस दाखविले आहे ते, शिवरायांच्या राज्याभिषेक प्रसंगी राजमाता जिजाऊ दरबारात कशावरून हजर होत्या, हा प्रश्न विचारून! हाही प्रश्न आतापर्यंत कुणी विचारला नव्हता. पुढे ते आणखी प्रश्न करतात की शिवरायांचे शिक्षण जिजाबाईंच्या देखरेखीखाली झाले, याला तरी पुरावा काय? महाराष्ट्राच्या ज्ञात इतिहासातील ज्या महान मातेने आपल्या युगकर्त्यां पुत्राची जडणघडण केली, हिंदवी स्वराज्याचे व सार्वभौम मऱ्हाटा राजपदाचे स्वप्न पाहिले, ते स्वप्न साकार होत असता राज्याभिषेक प्रसंगी ती माता दरबारात हजर असणार नाही तर कुठे असणार? रायगडावरील एखाद्या महालात दारे बंद करून त्या बसतील काय? त्यांचे दरबारात उपस्थित असणे ज्ञात इतिहासाशी सुसंगत नव्हे काय?

जिजाऊ शिवरायांची सावली

कर्नाटकातील जहागिरीतून पुणे जहागिरीत आल्यावर शिवरायांचे शिक्षण जिजाबाईंच्या देखरेखीखाली चालूच राहिले, या पाठय़पुस्तकातील विधानामुळे मुळे फारच व्यथित झाले आहेत. शिवभारतात तसा उल्लेख नसता असे विधान केलेच कसे, किंवा त्याचे संदर्भ जयसिंगरावांनी कुठून मिळवले असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.शिवाजी महाराजांसारखा महापुरुष जिजाबाईंनी घडविला, या त्यांच्या कामगिरीत त्यांच्या शिक्षणावरील देखरेख ही फारच मामुली गोष्ट आहे. शिवरायांच्या जीवनात त्या त्यांच्या संरक्षक देवता म्हणून राहिल्या आहेत, असे तमाम शिवचरित्रकार म्हणत आले आहेत. पण श्यामसुंदर मुळे यांना त्याचा पुरावा हवा आहे. ऐतिहासिक संदर्भ हवे आहेत. तेव्हा शिवरायांच्या शिक्षणावर देखरेखच नव्हे, तर त्यांची सावलीप्रमाणे सोबत जिजामातेने केल्याचा दाखलाच आम्ही येथे सादर करत आहोत.शहाजीराजांच्या पदरी असलेल्या जयराम पिंडे या पंडिताने ‘राधामाधवविलासचंपू’ नावाचे एक शहाजीचरित्र रचले आहे.

त्यामध्ये शहाजीराजासारख्या पराक्रमी पुरुषास जिजाईसारखे स्त्रीरत्न कसे शोभून दिसत होते आणि जिजाईची कीर्ती सर्व भरतखंडात कशी पसरली होती, याचे वर्णन करताना तो म्हणतो, ‘‘जशी चंपकेशी खुले फुलल जाई। भली शोभली ज्यास जाया जिजाई ।। जिचे कीर्तिचा चंबु जंबुद्विपाला। करी साऊली माऊलींसी मुलाला।।’’जयराम पिंडेच्या या कवनावर भाष्य करताना इतिहासाचार्य राजवाडय़ांनी म्हटले आहे, ‘‘जिजाई ही शहाजीसारख्या धीर, उदार व पराक्रमी पुरुषाला चांगलीच साजण्यासारखी बायको होती आणि.. स्वत:च्या धीर, उदार व गंभीर वृत्तीने तिची कीर्ती त्या काळी सर्व भरत खंडभर पसरली होती. इतकेच नव्हे तर तिच्या कीर्तीच्या.. सावलीखाली सर्व जंबुद्विपातील सज्जन लोक यवनाच्या जुलूमाला कंटाळून आश्रयार्थ येत असत, असे जयराम लिहितो. (यावरून) जिजाई ही कोणत्या तोलाची बाई होती, याचा अंधुक तर्क जयरामाच्या या समकालीन उक्तीवरून करता येतो. पुणे व सुपे प्रांताची व्यवस्था पाहणाऱ्या, शिवाजीच्या शिक्षणाकडे लक्ष देणाऱ्या, स्वत: गोरगरिबांचा समाचार घेणाऱ्या व गुणी सज्जनांना आश्रय देणाऱ्या या बाईच्या कर्तबगारीचे तपशीलवार वर्णन न देता केवळ एक त्रोटक श्लोक करून कवी गप्प बसला, हे पाहून कवीवर संशोधकांचा राग झाल्यास तो अयथार्थ होणार नाही.’’इतिहासाचार्याच्या भाष्यानंतर माझ्यासारख्याने काही म्हणण्याची गरज नाही, इतके ते मार्मिक आहे. याउपरीही श्यामसुंदरांना जिजाऊंच्या शिवरायांच्या शिक्षणावरील पुरावा हवा असेल तर आम्हीच त्यांना विचारतो की, शिवरायांच्या शिक्षणावर अन्य कोणाची देखरेख होती असे सांगणारा एखादा समकालीन पुरावा त्यांनी सादर करावा.

मुळे यांचा खरा राग

मुळे यांचा खरा राग आहे तो आम्ही शिवरायांचे शिक्षण दादोजींनी केले, याला समकालीन पुरावा मागितल्याबद्दल आणि समकालीन कागदपत्रांत तो उपलब्ध नसल्याने दादोजींना शिक्षक पदावरून हटविल्याबद्दल. खरे म्हणजे दादोजींनी शिक्षण केले यास समकालीन पुरावा नाही, हे एकच कारण त्यासाठी नाही; तर शिवरायांचे शिक्षण कोणी केले, कोणकोणत्या विद्या व कला त्यांनी शिकवल्या याविषयी स्पष्ट निर्देश परमानंदाने शिवभारतात केला आहे. त्यामुळे शिवरायांच्या शिक्षणाचे, विद्यादानाचे श्रेय त्या शिक्षकांना दिले पाहिजे, अन्य कुणास नाही, असा विचार तज्ज्ञ समितीने केला. त्यामागे कोणताही आकस नाही.शहाजीराजांनी बंगळूरहून पाठवून दिलेल्या ‘विख्यात अध्यापक’ वर्गाने शिवरायाचे शिक्षण केले, असे परमानंद सांगतो तर त्यांची नावे का देत नाही, असे मुळे विचारतात. २१व्या शतकात असा प्रश्न कुणी उपस्थित करेल, अशी पूर्वकल्पना परमानंदास असती तर त्याने ती दिली असती! दुसरे असे की शिवरायांना शिकवलेल्या विविध कला व शास्त्रे यांची यादी एवढी मोठी आहे की ती शिकवणाऱ्या अध्यापकांच्या नावाची लांबलचक यादी देणे त्याने टाळले असावे. पण नावे दिली नाहीत म्हणून परमानंदाची साक्षच खोटी असे होत नाही.

पुरंदरे-मेहेंदळे काय म्हणतात?

कविंद्र परमानंदाचे ‘शिवभारत’ हे कसे अव्वल दर्जाचे विश्वसनीय साधन आहे, हे सांगण्यासाठी एक स्वतंत्र लेखच लिहावा लागेल. तसा अवकाश येथे नाही. म्हणून मी महाराष्ट्रातील फक्त दोन विख्यात शिवचरित्रकारांची शिवभारतासंबंधीची मते उद्धृत करत आहे.पहिले आहेत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. ते म्हणतात, ‘‘माझा अंदाज आहे की शिवाजी महाराजांच्या बालपणापासून परमानंदाचा व भोसले घराण्याचा संबंध असावा. (बहुधा १६३५ च्या पुढे) तो आपल्या संपूर्ण लेखनात जे बारकावे देतो ते इतके विश्वसनीय आहेत की तितक्या बारकाव्यानिशी लिहिणारा हा मनुष्य जास्त जवळचा संबंध असल्याखेरीज इतके अचूक लिहू शकणार नाही. आपण शिवभारताचा तौलनिक अभ्यास केल्यावर असे लक्षात येते की, अस्सल पर्शियन कागदपत्रांतून किंवा मराठी कागदपत्रांतून, जेधे शकवलीसारख्या कागदपत्रांतून जी माहिती आपणाला मिळते तशीच माहिती हा परमानंद कवी शिवभारतात लिहितो. त्यामुळे तो एक साधनग्रंथ बनला आहे.. एकंदरीत परमानंदाचा आणि शिवाजीमहाराजांचा मोठा सहवास होता, असे दिसते. त्यामुळे परमानंदांनी लिहिलेले, ‘शिवभारत’ अतिशय विश्वसनीय माहितीपूर्ण आहे.’’दुसरे शिवचरित्रकार मेहेंदळे यांनी म्हटले आहे : ‘‘शिवभारत हे शिवचरित्राचे एक समकालीन आणि अतिशय विश्वसनीय साधन आहे.. आपण हे काव्य शिवाजीच्या सांगण्यावरून रचले असल्याचे परमानंद सांगत असल्याने आणि त्याची विश्वासार्हता वारंवार प्रत्ययास येत असल्याने ते शिवाजीचे अधिकृत चरित्र आहे, असे समजण्यास हरकत नाही.’’

मुळे यांचा अजब न्याय

आता ‘शिवभारत’विषयी मुळे काय म्हणतात पाहा- ‘‘जयसिंगराव पवार समजतात तसे ‘शिवभारत’ हे शिवाजीचे अधिकृत चरित्र नव्हे. कारण त्यामध्ये इ. स. १६३० ते १६६१ पर्यंतचाच शिवाजीचा इतिहास आला आहे. शिवाजीचा ३१ वर्षांपर्यंतचाच इतिहास ‘शिवभारत’ मध्ये असल्याने शिवाजीचे उर्वरित १९ वर्षांचे आयुष्य समजून घेण्यासाठी अन्य ऐतिहासिक साधनांचाच आधार घ्यावा लागतो. त्यामुळे जयसिंगराव पवार समजतात तसे ‘शिवभारत’ला अधिकृत चरित्र कसे मानता येईल?’’शिवभारतासारख्या समकालीन अव्वल साधनास ‘अनधिकृत’ ठरविण्यासाठी मुळे यांनी केलेला खटाटोप थक्क करणारा आहे! त्यांचे मत मान्य केले तर पुरंदरे-मेहेंदळे या शिवचरित्रकारांना इतिहासशास्त्रातील काही समजत नाही, असे मानावे लागेल! हे खरे की इतिहास संशोधक दिवेकर यांना शिवभारताचे हस्तलिखित त्रुटित स्वरूपात मिळाले. एकूण ३२ अध्यायात शेवटच्या अध्यायाचे तर नऊच श्लोक उपलब्ध झालेत. पुढचे श्लोक व अध्याय भविष्यात सापडणारच नाहीत असे नाही. तसे ते सापडले तरच मुळे शिवभारताला अधिकृत मानणार, नाहीतर ते अनधिकृत समजणार! मुळेंच्या इतिहासशास्त्रातील हा मोठा अजब न्याय आहे.‘शिवभारत’ हे अधिकृत शिवचरित्र एवढय़ासाठी मानले जाते की त्यातील अनके घटना, तारखा व व्यक्ती याविषयीची विश्वासार्हता प्रत्यंतर पुराव्याने सिद्ध होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे खुद्द परमानंद हा शिवाजी महाराजांच्या सहवासातील असून त्यांच्या आदेशानेच त्याने हे चरित्र रचले आहे! याशिवाय शिवभारताच्या अधिकृतपणाला आणखी काय पुरावे हवेत? पण झोपी गेलेल्यास जागे करता येते, सोंग घेणाऱ्यास नाही?अशा प्रकारच्या समकालीन विश्वसनीय पुराव्याच्या आधारे पुनर्लेखन केलेल्या चौथी इतिहासाच्या पाठय़पुस्तकास ‘जयसिंगराव पवार यांनी लिहिलेली बखर’ म्हणून हिणवावे, हे दुर्दैव आहे. ज्या बखरींच्या आधारावर दादोजी हे शिवरायांचे शिक्षक म्हणून ते पुढे आणू इच्छितात, त्याच बखर वाङ्मयास त्यांनी कमी लेखावे, हे बरे नव्हे.

मुळे यांना आवाहन

मुळे यांनी आपल्या प्रदीर्घ लेखात, जयसिंगराव पवारांनी आपली मते कशी बदलली, त्यांनी आपले नवे मत ज्या शिवभारताच्या आधारे मांडले आहे, ते कसे अधिकृत नाही, जिजाईंनी शिवरायांच्या शिक्षणावर देखरेख कशावरून केली, त्या राज्याभिषेकाच्या प्रसंगी दरबारात कशावरून हजर होत्या, असे अनेक प्रश्न उपस्थित करून त्यावर साद्यंत चर्चा केली आहे. तथापि त्यांनी अशी चर्चा करण्यापेक्षा दादोजी कोंडदेवांनी शिवरायास अमुक एक विद्या वा कला शिकवल्याचा दोन ओळींचा अस्सल समकालीन पुरावा सादर केला असता तर माझ्यावरच नव्हे तर सर्व महाराष्ट्रावर उपकार झाले असते. म्हणजे दादोजी शिवरायांचे शिक्षक होते की नव्हते, हा वाद कायमचा निकालात निघाला असता. माझे श्यामसुंदर मुळे यांना आवाहन आहे की, त्यांनी अशा पुराव्याचा अवश्य शोध घ्यावा आणि तो पुरावा महाराष्ट्राच्या समोर मांडावा. तसे झाले तर आम्ही आमच्या मतात जरूर सुधारणा करू आणि चौथीच्या पुस्तकातही ती अमलात आणू. त्यासाठी दुराग्रही असण्याचे कारण नाही.कारण इतिहास हे एक प्रवाही शास्त्र आहे. जसजशी नवनवीन साधने शोधली जातात, जसजशी नवनवीन दृष्टिकोनातून त्यांची चिकित्सा व मांडणी होते, तसतसा तो बदलत जातो. तो तसा बदलत जाणे हे त्याच्या जिवंतपणाचे व प्रगतीचे लक्षण आहे. एके काळी बखरी प्रमाणभूत मानून इतिहासकारांनी शिवाजी- रामदास भेट इ. स. १६४९ मध्ये निश्चित केली होती. पुढे गोविंदराव चांदोरकर, प्रा. न. र. फाटक प्रभृतींनी त्यांची भेट इ. स. १६७२ पर्यंत झालीच नव्हती, हे कागदपत्राच्या आधारे सिद्ध केले. आज त्यांचे मत सर्वमान्य झाले आहे. ५०-६० वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीराजे म्हणजे मद्यपी, व्यभिचारी व राज्यबुडवा राजा म्हणून मराठी इतिहास व साहित्य यामध्ये प्रतिमा होती. बेंद्रे, गोखले, पगडी प्रभृतींनी आपल्या संशोधनाने इतिहासाची पुनर्माडणी करून संभाजी राजांची एक तेजस्वी व पराक्रमी प्रतिमा महाराष्ट्रासमोर आणली. आज ती प्रतिमा मराठी माणसांच्या अभिमानाचा विषय बनला आहे. इतिहासाची पुनर्माडणी करण्याचा प्रत्येक पिढीला अधिकार असतो. नव्हे तो असायलाच हवा. पण अशी मांडणी भरभक्कम पुराव्याच्या आधारे करायला हवी, हेही तेवढेच खरे.मुळे यांनी भावनेच्या भरात मी केलेल्या इतिहासाच्या पुनर्माडणीबद्दल ‘‘इतिहास त्यांना कधीही क्षमा करणार नाही.’’ अशी शापवाणी उच्चारली आहे. पण इतिहासाची अशी साक्ष आहे की फाटक, बेंद्रे, गोखले, पगडी या इतिहासकारांना इतिहासाने केवळ क्षमाच केली नाही तर त्यांच्या कामगिरीबद्दल गौरविले आहे. मी या मोठय़ा इतिहासकारांच्या पंगतीत बसत नाही, याची मला जाणीव आहे. पण इतिहास मला क्षमा करेल की शिक्षा करेल, हे काळच ठरवील, श्यामसुंदर मुळे नव्हे!

Sunday 21 June 2009

शिवरायांचे शिक्षण कोणी केले?


खरे तर हा इतिहासाच्या क्षेत्रातील प्रश्‍न आहे; पण गेले काही दिवस महाराष्ट्रातील समाजकारण व राजकारण अशा दोन्ही क्षेत्रांत तो गाजतो आहे. त्याला अनेक संदर्भ आहेत. इतिहासाचा संदर्भ एकाच गोष्टीशी असतो आणि ती गोष्ट म्हणजे निखळ ऐतिहासिक सत्य. वरील वादाच्या बुडाशी असणाऱ्या सत्याचा मागोवा घेण्याचा हा एक प्रयत्न.
गेली जवळजवळ ४० वर्षे महाराष्ट्रात चौथी इतिहासाचे पुस्तक चालू होते. या वर्षी त्यात काही सुधारणा, काही नवी भर घालून त्याची नवी सुधारित आवृत्ती नुकतीच "बालभारती'तर्फे प्रकाशित करण्यात आली. या आवृत्तीसाठी जी तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती, तिचा मी सभासद होतो. गेले काही दिवस या वादाच्या निमित्ताने माझ्यावरही टीकाटिप्पणी झाली. तेव्हा या प्रश्‍नामधील समितीची व माझी भूमिका मी स्पष्ट करू इच्छितो.
टीकाकारांचा मुख्य आक्षेप असा, की नव्या पुस्तकात दादोजींचा "शिवरायांचे गुरू' म्हणून असलेला उल्लेखच वगळण्यात आला आहे. वस्तुस्थिती अशी आहे, की दादोजींचा शिवरायांचे गुरू म्हणून जुन्या पुस्तकात कुठेच उल्लेख नाही. तेव्हा तो वगळण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. जुन्या पुस्तकात पान क्रमांक १६ वर दादोजींच्या देखरेखीखाली पुणे प्रांती शिवरायांचे कोणकोणत्या विषयांचे शिक्षण झाले याचे वर्णन आहे. त्यावरून दादोजी हे "शिक्षक' म्हणून पुढे येतात; गुरू म्हणून नव्हे. गुरू जीवितकार्याची प्रेरणा देतो. शिक्षक व्यावहारिक ज्ञान देतो.
उपरोक्त वर्णनाच्या शेजारच्याच पानावर दादोजींच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचे शिक्षण चालू असल्याचे चित्र आहे. नव्या पुस्तकात उपरोक्त वर्णन व हे चित्र बदलून त्या ठिकाणी शहाजीराजांचे चित्र घातले आहे. तसेच पुणे जहागिरीत दादोजींच्या ऐवजी शहाजीराजांनी पाठवून दिलेल्या शिक्षकांनी शिवरायांना विविध कला व शास्त्रे शिकवली, असा नवा उल्लेख केला आहे.
कळीचा मुद्दा हा आहे. टीकाकारांचे म्हणणे असे, की जातीय संघटनांच्या दबावाखाली तज्ज्ञ समितीने हा बदल कोणताही पुरावा नसताना केला आहे!
हा घ्या अस्सल पुरावा
समितीने केलेला बदल मनाच्या लहरीवर अथवा कुणाच्या दबावाखाली केलेला नाही. समकालीन पुराव्याच्या आधारावर केलेला आहे. कर्नाटकात शहाजीराजांच्या पदरी ७० पंडित होते. त्यापैकी कवींद्र परमानंद हा एक होता. त्याने महाराष्ट्रात येऊन शिवरायांच्या आज्ञेने काव्यमय शिवचरित्र संस्कृतमध्ये रचले आहे. त्याने म्हटले आहे, की जिजाबाई व शिवराय कर्नाटकात बेंगळूर मुक्कामी असता शिवराय ७ वर्षांचे झाल्यावर शहाजीराजांनी त्यांना तेथील गुरूंच्या मांडीवर बसवून त्यांच्या शिक्षणाचा प्रारंभ केला. (अध्याय ९, श्‍लोक-७०-७१)
पुढे शिवरायांचे शिक्षण शहाजीराजांच्या देखरेखीखाली चालूच राहिले. शिवराय १२ वर्षांचे झाल्यावर शहाजीराजांनी त्यांची आणि जिजाऊंची पाठवणी पुणे प्रांती केली. त्यावेळी परमानंद म्हणतो, की शहाजीराजांनी त्यांच्याबरोबर हत्ती, घोडे, पायदळ, ध्वज, खजिना, विश्‍वासू अमात्य, पराक्रमी सरदार आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विख्यात अध्यापक दिले. (अध्याय १०, श्‍लोक २५-२७)
शिवभारतकार पुढे म्हणतो, की शहाजीराजांनी पाठवून दिलेल्या या अध्यापकांनी श्रुती, स्मृती, पुराणे, रामायण व महाभारत, राजनीतिशास्त्र, बहुविध भाषा, पद्यरचना, सुभाषिते, काव्यशास्त्र, फलज्योतिष, सांग धनुर्वेद, अश्‍वपरीक्षा, गजपरीक्षा, अश्‍वारोहण, गजारोहण, तलवार, पट्टा, भाला, चक्र इत्यादी शस्त्रे चालवण्याची कला, बाहुयुद्ध, युद्धकला, दुर्ग दुर्गम करण्याचे शास्त्र म्हणजे दुर्गशास्त्र, दुर्गम अशा शत्रुप्रदेशातून निसटून जाण्याची कला, शत्रुपक्षाचे इंगित जाणण्याची कला, जादूगिरी, विष उतरवण्याची कला, रत्नपरीक्षा अशा अनेक विषयांत शिवरायांना प्रवीण केले. (अध्याय १०, श्‍लोक ३४-४०)
सारांश, शिवरायांना शिक्षण देण्यासाठी शहाजीराजांनी निरनिराळ्या कलांत व शास्त्रांत निष्णात असणारा एक अध्यापकवर्गच शिवाजीराजांबरोबर कर्नाटकातून पाठवला होता. या अध्यापक वर्गावर देखरेख होतच असेल तर राजमाता म्हणून जिजाबाईंची होईल, दादोजींची नाही. दादोजी हे काही विविध कला व शास्त्रे जाणणारे पंडित नव्हते. त्यांच्या अंगी प्रशासनकौशल्य होते. त्यानुसार ते शहाजीराजांच्या जहागिरीची चोख व्यवस्था ठेवण्याचे काम निष्ठेने व सचोटीने करत होते. पण इथे शिवाजीराजांच्या शिक्षणाशी काही संबंध असण्याची गरज नाही. शिवभारतकार तर दादोजींचा नामोल्लेखही करत नाही.
तज्ज्ञ समितीने काय केले?
जुन्या पुस्तकात दादोजींच्या देखरेखीखाली शिवरायांचे शिक्षण झाले आणि घोडदौड, तलवारबाजी, भालाफेक, तिरंदाजी, कुस्ती, प्रशासन, न्यायनिवाडा या विषयांत ते तरबेज झाले, असे म्हटले आहे. या विधानास शिवरायांच्या मृत्यूनंतर शे-दीडशे वर्षांनी लिहिलेल्या बखरीतील उल्लेख पुरावे म्हणून पुढे केले जातात. शिवचरित्रकार श्री. मेहेंदळे यांनी दादोजी हा शिवरायांचा गुरू म्हणून फक्त बखरीतच उल्लेख असल्याचे म्हटले आहे. (डीएनए ता. ४.६.२००९)
आता समितीसमोर असा प्रश्‍न उभा राहिला, की शिवकालीन अत्यंत विश्‍वसनीय असणाऱ्या खुद्द शिवरायांच्या आदेशाने लिहिलेल्या परमानंदाच्या शिवभारतातील मजकूर प्रमाण मानायचा, की शिवरायांनंतर शे-दीडशे वर्षांनी लिहिलेला बखरींतील मजकूर प्रमाण मानायचा? समितीने शिवभारतातील मजकूर प्रमाण मानून शिवरायांचे शिक्षण शहाजीराजांच्या देखरेखीखाली आणि त्यांनी नेमलेल्या शिक्षकांकडून झाले, असे नव्या पुस्तकात नमूद केले आहे. चित्रातही शहाजीराजांच्या देखरेखीखाली शिवरायांचे शिक्षण झाले, असे दाखविले. इतिहासलेखनशास्त्राला धरूनच ही कृती आहे.
ज्या शिवभारताच्या आधारावर आम्ही इतिहासाची उपरोक्त पुनर्मांडणी केली आहे, त्या शिवभारताचा इतिहासलेखनाच्या संदर्भात गौरव करताना श्री. मेहेंदळे यांनी म्हटले आहे, ""शिवभारत हे शिवचरित्राचे एक समकालीन आणि अतिशय विश्‍वसनीय साधन आहे. परमानंदाचे शिवकालीनत्व अनेक पुराव्यांनी सिद्ध आहे. आपण हे काव्य शिवाजीच्या सांगण्यावरून रचले असल्याचे परमानंद सांगत असल्याने आणि त्याची विश्‍वासार्हता वारंवार प्रत्ययास आली असल्याने ते शिवाजीचे अधिकृत चरित्र आहे, असे समजण्यास हरकत नाही. परमानंदाला शिवचरित्राची जवळून माहिती होती आणि या ग्रंथात ती प्रामाणिकपणे नमूद केल्याचेही आढळून येते. त्याचप्रमाणे या ग्रंथात दिलेल्या माहितीस इतर विश्‍वसनीय साधनांकडून दुजोरा मिळतो.'' (शिवभारत, संपा. स. म. दिवेकर, दुसरी आवृत्ती, १९९८)
अशा या शिवकालातील "समकालीन आणि अतिशय विश्‍वसनीय' साधनाबद्दल श्री. मेहेंदळे एक शब्दही आता काढत नाहीत. का? शिवभारतातील पुरावा बखरीतील पुराव्याच्या विरोधात जातो म्हणून?
सत्य कोण लपवून ठेवत आहे?
तज्ज्ञ समितीने केलेल्या उपरोक्त बदलावर हल्ला करताना श्री. मेहेंदळे यांनी म्हटले आहे, ""इतिहासाच्या (या नव्या) पुस्तकात करण्यात आलेले फेरबदल हे कोणतेही नवीन पुरावे अथवा माहितीशिवाय केले गेले आहेत. त्यामुळे नव्या पिढीपासून हेतुपुरस्सर काही गोष्टी लपवून ठेवण्याचा (हा) प्रकार घातक आहे.'' (सकाळ ः ६.६.०९)
तज्ज्ञ समितीने नवीन पुरावे पुढे आणले नाहीत हे खरे; पण जे अस्सल पुरावे आतापर्यंत अंधारात हेतुपुरस्सर (?) ठेवले गेले ते उजेडात आणले आणि त्यावर आधारित इतिहासाची पुनर्मांडणी केली आहे, हे श्री. मेहेंदळेही मान्य करतील. आम्ही नव्या पिढीपासून ऐतिहासिक सत्य लपवून ठेवत नाही. उलट त्यावरची धूळ झटकून ते चकचकीत करत तिच्यासमोर ठेवत आहोत.
श्री. मेहेंदळे शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आहेत. अतिशय चिकित्सक पद्धतीने त्यांनी शिवचरित्राचे तीन मोठे खंड प्रकाशित केले आहेत. त्यामध्ये "शिवाजीची साक्षरता' या नावाचे एक परिशिष्ट असून त्यामध्ये शिवराय हे साक्षर होते हे सिद्ध करण्यासाठी शहाजीराजांनी शिवरायांच्या शिक्षणाचा प्रारंभ बंगळूर मुक्कामी केल्याचा शिवभारतातील संदर्भ घेतला आहे (श्री राजा शिवछत्रपती, खं. १, भाग २, पृ. ७११). तथापि त्या परिशिष्टात पुढे शहाजीराजांनी शिवरायांबरोबर पुणे प्रांती धाडलेल्या शिक्षकांनी कोणकोणत्या विद्या व कला शिकवल्या, याचा उल्लेख दिलेला नाही. कारण तसा तो दिला असता तर पुणे जहागिरीत दादोजींनी शिवरायास शिक्षण दिले या बखरीवर आधारित प्रस्थापित इतिहासास छेद दिला गेला असता. तेव्हा नव्या पिढीपासून काही गोष्टी कोण लपवून ठेवीत आहे? आणि त्यामागचे रहस्य काय?
साक्षात्कार माझा आणि मेहेंदळेंचाही
सुमारे ३०-३२ वर्षांपूर्वी मी शिवकालावर एक क्रमिक पुस्तक लिहिले होते. त्यात मी दादोजींचा उल्लेख शिक्षक म्हणून (गुरू नव्हे) केल्याचे श्री. मेहेंदळे वारंवार पत्रकार परिषदेत व दूरदर्शनवर माझे पुस्तक दाखवून सांगतात. तसेच मी आता जातीय संघटनांच्या दबावाखाली माझे मत बदलले आहे, असे सांगून "आता जयसिंगराव पवारांना काय साक्षात्कार झाला? असा काय इतिहास पुढे आला? हे त्यांनी मलाही सांगावे,' असा जाहीर सवाल विचारतात. (राष्ट्रगीत, ७।०६।०९) त्याला जाहीर उत्तर देणे गरजेचे आहे.
माझे हे पुस्तक उपलब्ध शिवचरित्रांच्या अभ्यासावर आधारित होते. तो काही माझ संशोधनात्मक ग्रंथ नव्हता. पुढे जेम्स लेन प्रकरणानंतर दादोजीचा प्रश्‍न महाराष्ट्रात ऐरणीवर आला आणि अनेक सामाजिक संघटनांनी व शिवप्रेमींनी माझ्याकडे दादोजीच्या गुरुपदाविषयी विचारणा केल्यावर मी खास सवड काढून सर्व समकालीन साधने तपासली. अभ्यासाअंती माझे असे ठाम मत बनले, की दादोजी हे शिवरायांचे गुरू, शिक्षक, पालक किंवा मार्गदर्शक असल्याचे एकही उल्लेख समकालीन साधनात नाही. माझे हे मत मी २४ एप्रिल २००६ च्या पुण्यातील एका जाहीर परिसंवादात परखडपणे मांडून पूर्वीचे माझे मत बरोबर नसल्याचेही नमूद केले होते. या गोष्टीस आता तीन वर्षे होऊन गेली. तेव्हा मला काही साक्षात्कार झाला असेल तर तीन वर्षांपूर्वी आणि तोही अभ्यासाअंती झाला आहे, बिनपुराव्याचा नाही. पण आता श्री. मेहेंदळ्यांच्या साक्षात्काराविषयी काय? त्यांनी २५०० पानांचे शिवचरित्र लिहिले; पण दादोजी शिवरायांचे गुरू होते, असे कुठेच म्हटले नाही. शिक्षक होते, पालक होते असेही म्हटले नाही. मग आताच ते दादोजींची खिंड का लढवीत आहेत? असा आताच त्यांना काय साक्षात्कार झाला आहे?
वस्तुस्थिती अशी आहे, की दादोजी हे शिवरायांचे गुरू/शिक्षक असल्याचा एकही समकालीन पुरावा नसल्याने श्री. मेहेंदळे यांनी आपल्या शिवचरित्रात मौन बाळगले आहे. तथापि, बालभारतीच्या इतिहास पुस्तकात दादोजी शिवरायांचे गुरू परस्पर दाखवले गेले तर मनातून त्यांना हवेच आहे. त्याला त्यांचा विरोध तर नाहीच, उलट तसा आग्रह आहे.
खरोखरच दादोजी शिवरायांचे गुरू/शिक्षक असल्याचा समकालीन पुरावा पुढे आणला गेला तर आम्ही स्वागतच करू. कारण सत्यावर आधारित इतिहासाच्या पुनर्मांडणीस नेहमीच वाव असतो व तो असायला हवा.
डॉ. जयसिंगराव पवार

Sunday 14 June 2009

अर्थशास्त्रज्ञ आंबेडकर


जुलै १९२० मध्ये "बहिष्कृत हितकारणी' सभेची स्थापना केल्यापासून १४ ऑक्‍टोबर १९५६ रोजी बौद्धधम्माचा स्वीकार करण्यापर्यंतचा ३६ वर्षांचा काळ हा जातिव्यवस्था आणि अस्पृश्‍यतेच्या समूळ उच्चाटनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एकाकीपणे केलेल्या संघर्षाचा काळ आहे. केवळ भारताच्याच नव्हे, तर आधुनिक जगाच्या इतिहासातील हा संघर्ष एका अर्थाने अभूतपूर्व असाच म्हणावा लागेल. भारतातील जाती-वर्ण-अस्पृश्‍यतेवर आधारित विषम समाजव्यवस्थेमुळे येथे सामाजिक समता प्रस्थापित करण्याला डॉ. आंबेडकरांना अग्रक्रम द्यावा लागला. राजकीय लोकशाहीवर त्यांची प्रचंड निष्ठा असली, तरी आर्थिक समता निर्माण केल्याशिवाय सामाजिक समता अर्थपूर्ण ठरू शकत नाही आणि तांत्रिक राजकीय लोकशाही तर निरर्थक ठरते, याबद्दल त्यांना प्रथमपासूनच खात्री होती. त्यामुळेच त्यांनी राष्ट्रहित आणि गरिबांच्या आर्थिक समस्यांशी निगडित असलेल्या सगळ्या आर्थिक समस्यांचा मूलगामी आणि विश्‍लेषणात्मकदृष्ट्या सकस व समृद्ध अभ्यास केला.
कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात "पीएच.डी.' आणि लंडन विद्यापीठातून (सध्याच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्‍स) "डी.एस्सी' मिळविणारे डॉ. आंबेडकर हे पहिले आणि आतापर्यंतचे एकमेव भारतीय आहेत. ब्रिटिश कालखंडातील प्रादेशिक वित्तीय व्यवस्थेचा विकास (दि इव्हॉल्युशन ऑफ प्रोविन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया) हा त्यांच्या "पीएच.डी.चा विषय. त्यांचे मार्गदर्शक आणि प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ प्रा. सेलिगमन यांनी या प्रबंधास प्रस्तावना लिहिली आहे. डॉ. आंबेडकरांच्या ग्रंथाची थोरवी व्यक्त करताना ते म्हणतात, ""डॉ. आंबेडकरांचा प्रबंध वस्तुनिष्ठ असून आणि त्यांच्या स्वतःच्या देशात घडून येत असलेल्या महत्त्वपूर्ण स्थित्यंतरांचे (घटनांचे) निःपक्षपाती विश्‍लेषण त्यात आहे. त्यांच्या अभ्यासातून निघणारे निष्कर्ष हे इतर देशांनाही लागू होणारे आहेत.''
"डी.एस्सी'साठी डॉ. आंबेडकरांनी "भारतीय रुपयाची समस्या -स्वरूप आणि उपाय' हा विषय निवडला होता. त्यांचे मार्गदर्शक प्रा. एडविन कॅनन यांनी त्यांच्या अभ्यासाची मुक्तकंठाने स्तुती केली होती. १९१८ मध्ये आंबेडकरांनी भारतातील शेती क्षेत्रासमोरील समस्यांचे मूलगामी विश्‍लेषण केले. १९३६ मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या निवडणुकीसाठी तयार केलेल्या जाहीरनाम्यात गरिबांच्या हिताचे कोणते कार्यक्रम असावेत, याचे दिग्दर्शन केले. १९४२ ते १९४६ या काळात कामगार मंत्री असताना त्यांनी कामगारांच्या हिताचे अनेक कायदे करण्यात आणि कार्यक्रम राबविण्यात आणि पुढाकार घेतला. पुढे १९४६ मध्ये "ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्ट्‌स फेडरेशन'च्या वतीने घटना समितीस त्यांनी जो मसुदा सादर केला, तो "स्टेट्‌स अँड मायनॉरिटीज' या नावाने प्रसिद्ध आहे. त्यात त्यांनी प्रामुख्याने शासन व्यवस्थेचे अर्थव्यवस्थेत नेमके कोणते स्थान असावे, याचे मार्गदर्शन केलेले आहे.
शासकीय समाजवाद
डॉ. आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार, आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी आर्थिक धोरण आणि कार्यक्रम हे राज्य घटनेचे अविभाज्य भाग असले पाहिजेत. शेतीचे, मोठ्या उद्योगांचे राष्ट्रीयीकरण, प्रत्येक नागरिकासाठी सक्तीची विमा योजना आणि आर्थिक प्रगतीला हातभार लावण्यासाठी खासगी उद्योजकांना वाव देण्याच्या आवश्‍यकतेचा अंतर्भाव असायला हवा. हे कार्यक्रम शाश्‍वत होण्यासाठी त्यांना राज्य घटनेत मूलभूत गोष्टींचा दर्जा असायला हवा. म्हणजे अशा कार्यक्रमांना विरोध असलेला राजकीय पक्ष सत्तेवर आला, तरी त्याला हे कार्यक्रम रद्द करता येणार नाहीत.
या योजनेला डॉ. आंबेडकरांनी "घटनात्मक शासकीय समाजवाद' (कॉन्स्टिट्युशनल स्टेट सोशॅलिझम) असे नाव दिले.
गेल्या ७०-८० वर्षांमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेत जे महत्त्वाचे बदल झाले, त्यांचा विचार करता डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या घटनात्मक शासकीय समाजवादाच्या आराखड्याची फेरमांडणी करणे आवश्‍यक आहे. सध्याच्या जागतिक आर्थिक अरिष्टाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या शासन आणि बाजारपेठ यांचे अर्थव्यवस्थेत स्थान काय असावे, त्यांची कार्यक्षेत्रे नेमकी कोणती असावीत, त्यांचे परस्परसंबंध कसे असावेत, ते एकमेकांना पर्याय आहेत की पूरक, आर्थिक विकास सर्वसमावेशक करून व त्याचे फायदे गरिबापर्यंत पोचवून कल्याणकारी अर्थव्यवस्था कशी आणता येईल, भाववाढ रोखण्याबरोबरच आर्थिक अरिष्टांमुळे मोठ्या प्रमाणावर होणारी बेरोजगारी कमी करून रोजगार कसा वाढवता येईल, आदी प्रश्‍नांची जगभर चर्चा सुरू आहे. त्या दृष्टीने विचार करता डॉ. आंबेडकरांच्या आर्थिक विचारांतून कोणता निष्कर्ष काढता येणे शक्‍य आहे आणि त्याचे आजच्या जागतिक आर्थिक अरिष्टांच्या संदर्भात काय महत्त्व आहे, हे पाहायला हवे.
सध्याच्या आर्थिक अरिष्टाची सुरवात अमेरिकेतील वित्तीय संस्था आणि शेअर बाजार कोसळण्यापासून झाली. गेल्या २५-३० वर्षांच्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये सर्व राष्ट्रीय अर्थव्यवस्था एकमेकींशी पूर्वीपेक्षा खूपच निगडित झाल्यामुळे या अरिष्टाला जागतिक स्वरूप प्राप्त होणे अपरिहार्य होते. निर्यातीवर भर देणाऱ्या देशांवर तर या अरिष्टाचे विपरित परिणाम झाले आहेत. यामुळे उद्योगधंदे आणि सेवा क्षेत्रातील खासगी गुंतवणूक कमी होत आहे. परिणामी लाखो कामगार बेरोजगार होत आहेत. चीन आणि भारत या दोन्ही विकसनशील देशांवरही अरिष्टांचे परिणाम जाणवू लागले आहेत; परंतु याही परिस्थितीत, या दोन्ही देशांनी आर्थिक विकासाचा दर अनुक्रमे ९ टक्के व ६.५ ते ७ टक्के ठेवण्यात यश मिळविले आहे. अर्थात, एकूण जागतिक अर्थव्यवस्थेत कसे बदल होतात, त्यावर चीन आणि भारत यांच्यावरील परिणाम अवलंबून आहे.
मात्र, सध्याच्या पार्श्‍वभूमीवर एक मुद्दा अत्यंत स्पष्ट होत आहे. तो म्हणजे, बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्था आर्थिक प्रगतीचा दर वाढवू शकली, तरी ती जशी सामाजिक न्याय व सर्वसमावेशक विकास साध्य करण्याचे उद्दिष्ट आपोआप साध्य करू शकत नाही, तसेच योग्य नियमन (रेग्युलेशन) नसेल, तर बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्था आर्थिक अरिष्टांचे संकट केवळ स्वसामर्थ्यावर टाळू शकत नाही. त्यासाठी शासनाचा अर्थव्यवस्थेत परिणामकारक हस्तक्षेप असणे अनिवार्य वाटत आहे. अमेरिकेतील आर्थिक अरिष्टाची सुरवातच तेथील नफेखोरीच्या वृत्तीमुळे बॅंकिंग आणि वित्तीय व्यवस्था "अनियंत्रित' (अनरेग्युलेटेड) होण्यामुळे झाली.
अर्थव्यवस्थेची वाढ कुंठित करणारे अनावश्‍यक व जाचक निर्बंध (कंट्रोल्स) नकोत, हे खरे आहे; परंतु त्याबरोबरच केवळ चंगळवाद आणि नफेखोरी करण्यासाठी बॅंकिंग व वित्तीय संस्थांचे नियमन काढून टाकणे वा त्यांनी ते झुगारणे ही गोष्ट आर्थिक अरिष्टाला निमंत्रण देणारी ठरते. आपल्या देशात बॅंकिंग आणि वित्तीय व्यवस्था अरिष्टात न सापडण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे, आजही त्या दोन्ही क्षेत्रांचे नियमन मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकार करते. गरजेनुसार काही प्रमाणात या नियमनाचे स्वरूप बदलण्याची आवश्‍यकता डोळ्याआड करता येणार नाही; परंतु आपल्या देशातील काही मंडळी निर्बंध आणि नियमन यांत फरक करताना दिसत नाहीत, ही खेदाची गोष्ट आहे.
अकरावी योजना
सरकारने फक्त प्राथमिक शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, रस्ते आदी सामुदायिक सेवा पुरविण्यापर्यंतच मर्यादित करावे, उत्पादन क्षेत्रात हस्तक्षेप करू नये, अशी भूमिका काही जण घेताना दिसतात. परंतु, भविष्यात आर्थिक महासत्ता होण्याची शक्‍यता असलेल्या; पण आज मात्र तीस कोटी लोक दारिद्य्ररेषेखाली असलेल्या भारतासारख्या देशात उपरोल्लेखित सार्वजनिक सेवा गरिबांपर्यंत पोचविण्याची जबाबदारी सरकारला घ्यावीच लागणार आहे. मात्र, त्याबरोबरच शेती, वीज, सिंचन, रस्ते, गृहबांधणी, ग्रामीण विकास आणि इतर पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्यासाठी खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देताना स्वतः सरकारनेही काही प्रमाणात गुंतवणूक करण्याची गरज आहे.
म्हणजेच बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्थेत आर्थिक प्रगतीचा दर वाढविण्यासाठी सरकारने केवळ सहायकाचीच (फॅसिलिटेटर) भूमिका बजावून न थांबता, विकासाभिमुख भूमिका घ्यायला हवी. हीच भूमिका घेत अकराव्या पंचवार्षिक योजनेने "सर्वसमावेशक विकासा'चे उद्दिष्ट ठेवले आहे. एकूण योजनेच्या तीस टक्के रक्कम फक्त शिक्षण आणि आरोग्यावर खर्च होणार आहे. ग्रामीण विकास, राष्ट्रीय रोजगार हमी योजना, वीज व पाणीपुरवठा योजना, "इंदिरा आवास योजना', "भारत निर्माण' अशा कार्यक्रमांबरोबरच शेती, सिंचन, फलोत्पादन इ. उत्पादन क्षेत्रातही गुंतवणूक करण्यात येत आहे.

सुखी, समृद्ध जीवनासाठी बुद्ध तत्त्वज्ञानाची नितांत गरज

शाक्‍यपुत्र सिद्धार्थ गौतमाने सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी बुद्धगयेच्या बोधीवृक्षाखाली बसून दिव्य ज्ञान प्राप्त केले. ते ज्ञान त्यांनी स्वत:पुरते न ठेवता मानवजातीच्या व प्राणिमात्रांच्या कल्याणासाठी त्याचा प्रसार व प्रचार केला. सतत ६० वर्षे ते आपला उपदेश करीत फिरले. त्यांचा उपदेश म्हणजेच बुद्ध धम्म होय. "धम्म' हा शब्द पारंपरिक अर्थाने धर्म नसून तो मानसशास्त्र, तर्कशास्त्र आणि नीतिमूल्याचा समन्वय असलेली जीवन पद्धती आहे.
माणसाला विज्ञाननिष्ठ, विवेकवादी, विचारशील बनविणे हे बौद्ध धम्माचे परम उद्दिष्ट आहे. सनातन परंपरा, रूढी- अंधश्रद्धा व मानवी गुलामगिरी याविरुद्ध तत्त्वेच बुद्धाच्या शिकवणुकीचा मूळ गाभा आहे. प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री त्याचे स्तंभ आहेत. नीती ही बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा पाया आहे.
राष्ट्र ही एकत्वाची भावना आहे. जाती-पोटजातीत विभागलेला मानव समाज राष्ट्र म्हणून आकारला येऊ शकत नाही. समतेवर आधारित समाज रचना राष्ट्रीय एकात्मतेची पूर्व अट आहे. यास्तव बौद्ध धम्माची शिकवण जनतेत रुजविणे काळाची गरज आहे.
प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री हे सद्‌गुण माणसात रूजावेत; स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर आधारित समाज निर्माण व्हावा म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाची रचना करताना या बुद्ध तत्त्वांचा जाणीवपूर्वक अंतर्भाव संविधानात केला. बुद्ध तत्त्वज्ञान प्रत्येक भारतीयाला सतत प्रेरणादायी ठरावे म्हणून तिरंग्यावर "अशोकचक्र' कोरले आणि "त्रिमूर्ती'ला राजमुद्रा म्हणून मान्यता मिळवून दिली. भारताच्या राष्ट्रपतींच्या खुर्चीवर "धम्म चक्र प्रवर्तनाय' हा बुद्धाचा प्रथम संदेश कोरला. या सर्व बाबींचा मूळ हेतू हाच की भारत एक धम्मशासीत राज्य निर्माण व्हावे आणि एक उज्ज्वल राष्ट्र घडावे. सारा भारत बौद्धमय व्हावा, ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आंतरिक इच्छा होती.
सध्याच्या परिस्थितीत धम्मशासीत पिढी निर्माण करणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्यासाठी बालपणापासूनच मुलांना विज्ञाननिष्ठेचे मानवी मूल्याचे व विवेकाचे धडे देणे गरजेचे आहे. माणूस केवळ भाकरीवर जगत नाही. कारण त्याला मन आहे. त्या मनाला विचाराचे खाद्य पाहिजे. धम्म माणसाच्या हृदयात आशा निर्माण करतो. त्याला काम करण्यास प्रवृत्त करतो. बौद्ध धम्माला काळ आणि देश यांचे बंधन नाही. तो कुठल्याही देशात भरभराट पावू शकेल.
"बौद्ध धर्म' या ग्रंथाचे कर्ते ई. जे. मिल्स यांनी असे स्पष्ट प्रतिपादन केले की, ""बौद्ध धम्माइतका दुसऱ्या कोणत्याही धर्मात ज्ञानाच्या मूल्यावर आणि अज्ञानाच्या हिनतेवर भर दिलेला नाही. डोळे उघडे राखण्याबाबत दुसऱ्या कोणत्याही धर्मात इतका भर दिलेला नाही.''
प्रा. डब्ल्यू.टी. स्टेस आपल्या "बौद्ध धर्मीय नीतिशास्त्र' या ग्रंथात म्हणतात,""ज्ञान हे मुक्‍तीसाठी आवश्‍यक आहे आणि ते प्राप्त करण्यात अपयश येण्याची जी दोन कारणे आहेत त्यापैकी अज्ञान हे एक आहे तर दुसरे कारण तृष्णा आहे, असे बौद्ध धम्माने आग्रहपूर्वक सांगितले आहे.''
प्रगतिशील जगाला सर्वोच्च शिकवण देण्यासाठी बौद्ध धम्माचीच आवश्‍यकता आहे. विज्ञान हे बुद्धिप्रामाण्यवादाचे दुसरे नाव आहे. बुद्धाचा धम्म हा बुद्धिप्रामाण्यवादावर अधिष्ठित आहे. भगवान बुद्धाने सांगितलेला "अनित्यतेचा सिद्धांत' खरा ठरला आहे. बौद्ध धम्माने मानवात प्रच्छन्न असलेला अंत:सामर्थ्याच्या शोधाकडे लक्ष वेधले. सदाचारास प्रवृत्त होण्यासाठी मानसिक संस्काराचे महत्त्वही सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३ ऑक्‍टोबर १९३५ रोजी येवला परिषदेत म्हणाले होते, ""जो धर्म आपल्याला समान दर्जा देईल, समान हक्‍क देईल आणि योग्य तऱ्हेने वागवील अशा एखाद दुसऱ्या धर्मात जावे, असे तुम्हाला वाटत नाही काय? दुर्दैवाने मी अस्पृश्‍य जातीत जन्मास आलो हा काही माझा अपराध नाही. परंतु, मरताना मात्र मी हिंदू म्हणून मरणार नाही.'' यावेळी निश्‍चितच डॉ. आंबेडकरांच्या मनात बौद्ध धम्म अधिष्ठित झालेला होता.
"गौतम बुद्धाचे चरित्र' हे पुस्तक बाबासाहेबांनी बालपणीच वाचले होते. तेव्हापासून बुद्ध तत्त्वज्ञानाचे कित्येक ग्रंथ त्यांनी वाचले होते. बुद्धाच्या संदेशात सिद्धांत आणि सामाजिक सुधारणा यांचे संकलन आहे. बुद्धाचा विचार हा एक सामाजिक संदेश आहे. बौद्ध धम्म प्रज्ञा शिकविते, करुणा शिकविते, समता शिकविते, या जगात सुखी आणि उत्तम जीवन जगता येण्यासाठी माणसाला याच गोष्टींची गरज आहे. विज्ञान जाणणाऱ्या आधुनिक माणसाला जर धर्म हवाच असेल तर बुद्धाचा धम्म याच एका धर्माचा स्वीकार करणे त्याला शक्‍य होईल, असे डॉ. आंबेडकरांनी प्रतिपादन केले.
बुद्धजयंतीच्या वेळी नवी दिल्ली येथे एका सभेत बोलताना डॉ. आंबेडकर म्हणाले, "बौद्ध धर्म नीतीवर अधिष्ठित आहे. बुद्ध हा मार्गदाता आहे. बौद्ध धर्मात देवाची जागा नीतीने घेतलेली आहे. धर्म या शब्दाचा क्रांतिकारक अर्थ बुद्धाने विचारार्थ मांडला. बौद्ध धर्म हा समतेसाठी उभा आहे.
२९ सप्टेंबर १९५० रोजी वरळी येथील बौद्ध मंदिरामध्ये भाषणात डॉ. आंबेडकर म्हणाले, ""आपल्या हालअपेष्टा थांबविण्यासाठी लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारावा. आपले उर्वरित आयुष्य बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन आणि प्रसार करण्यासाठी व्यतीत करीन.'' १४ ऑक्‍टोबर १९५६ मध्ये नागपूरच्या नागभूमीवर त्यांनी धम्मचक्र फिरविले. इतिहासात अभूतपूर्व असा धम्मदीक्षेचा सोहळा संपन्न झाला. मनुष्य हा धर्माकरिता नसून, धम्म हा मनुष्याकरिता आहे. बुद्धाविषयी डॉ. आंबेडकर म्हणतात, "Buddha was the first teacher in the world, who made morality the essence and foundation of religion. ''
बुद्ध धम्माला देव-दैव, आत्मा-परमात्मा, पुनर्जन्म, कर्म या बाबी मान्य नाहीत. अंधश्रद्धा, रूढी-परंपरा बुद्धाने त्याज्य मानल्या आहेत. बुद्ध धम्मात जात, उच्च-निचता नाही. स्त्री-पुरुष समानता बुद्धाने मान्य केलेली आहे. सर्वांना समान संधी बहाल केली आहे. "बहुजन हिताय, बहुजन सुखाय' हे बुद्धाचे वचन आहे. "अत्त दिपो भवं' हा बुद्धाचा महान संदेश आहे.
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनीसुद्धा "होवो बुद्धाचे पुनरागमन' अशी कविता करून भारतात बुद्धाच्या पुनरागमनाची वाट पाहिली.
आज जगात आतंकवाद वेगाने पसरत आहे. मानवी मूल्याचे अवमूल्यन होत आहे. सीमावाद, प्रांतवाद गतिमान होत आहे. स्त्रियांवर रोजच अत्याचार होत आहे. देव- दैववाद डोके वर काढत आहे. कुजलेल्या जीर्ण रूढी- परंपरा पुनरुज्जीवित केल्या जात आहेत. एकाचे मंदिर पाडून दुसरा आपले मंदिर बांधत आहे. राजकारणाच्या नावाने हुकूमशाही वाढीस लागत आहे.
नवीन पिढी वेगाने व्यसनाधिनतेकडे जात आहे. न्याय व्यवस्था लुळी झालेली आहे. जाती व्यवस्था पुन्हा मूळ धरू लागली आहे. शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात देवी-देवतांचे प्रस्थ वाढत आहे. दूरदर्शनवर देव, अंधश्रद्धा, भूत- पिशाच्च यांचे आक्रमण सुरू आहे. या सर्व बाबींना दूर सारण्यासाठी आणि माणसाला सुखी व समृद्ध जीवन जगण्यासाठी बुद्ध तत्त्वज्ञानाची नितांत गरज आहे. यासाठी प्रत्येक बौद्ध म्हणविणाऱ्या उपासक-उपासिका, भिक्‍खू तथा भिक्‍खू संघ यांनी महायान- हीनयान या वादात न पडता सांघिक प्रयत्न करण्याची कालसापेक्ष गरज आहे. डॉ. आंबेडकर यांच्या शब्दांत "जग हे धम्म राज्य निर्माण होण्याची गरज आहे.'

Wednesday 10 June 2009

इतिहासातील गूढ

इतिहास बदलतो की तसाच राहतो? इतिहास कोण लिहितं आणि कोण बदलतं? प्रश्न गूढ आहेत. ते पुन: पुन्हा विचारले जातात आणि वादाला तोंड फोडतात. दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचा उल्लेख गाळून ते उत्तम प्रशासक होते, असा बदल इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात यावषीर् केला गेल्यानंतर अशाच एका वादाला तोंड फुटलंय आणि काही जातीय संघटनांच्या दबावाला सरकार बळी पडल्याचा आरोप करीत काही राजकीय पक्षांनी वातावरण तापवलंय. वस्तुस्थिती काय आहे?
गेल्या वषीर् पुण्याच्या सचिन गोडांबे या कम्प्युटर इंजिनीयर तरुणाने माहितीच्या अधिकाराखाली सरकारकडे एक पत्र पाठवून विचारणा केली होती की, शालेय पाठ्यपुस्तकातील धड्यात दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू होते, असं जे लिहिलेलं आहे त्याला कोणता ऐतिहासिक आधार आहे? त्यावर शिक्षण मंडळाने असं कळवलं होतं की, हा उल्लेख ३७ वर्षांपूवीर्चा असून त्यावेळी कोणता पुरावा लेखकाने वापरला होता याची कल्पना नाही व आता तसा पुरावा देता येत नाही. त्यावर गोडांबेंनी कळवलं की, सरकारकडे पुरावा नसेल तर हा उल्लेख काढून टाकावा. मग सरकारने याबाबतची ऐतिहासिक सत्यता पडताळून पाहण्यासाठी इतिहास संशोधक आणि अभ्यासकांची एक समिती नेमली. या समितीने दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरू नव्हते असा निर्वाळा दिला. प्रसिद्ध इतिहास संशोधक डॉ. जयसिंग पवार हे या समितीचे एक सदस्य होते.
डॉ. पवार यांच्या म्हणण्याप्रमाणे, ''परमानंदकृत 'शिवभारत' या शिवचरित्राच्या रूपाने अत्यंत विश्वसनीय पुरावा उपलब्ध आहे. आणि तो नव्याने वगैरे सापडलेला नाही, तो जुनाच आहे. परमानंद हे शहाजी राजांच्या पदरी होते. ते पुणेप्रांती आल्यावर शिवाजी महाराजांनी त्यांना स्वत:चं चरित्र लिहिण्याची आज्ञा केली. ती शिरसावंद्य मानून परमानंदांनी शिवरायांच्या बरोबर राहून त्यांचं चरित्र लिहिलं. शिवबांना वयाच्या बाराव्या वषीर् जिजामातेसह शहाजी राजांनी बेंगळुरूहून पुणेप्रांती पाठवलं तेव्हा त्यांच्याबरोबर हत्ती, घोडे, पायदळ, मुबलक खजिना अशा गोष्टींबरोबरच काही निष्णात अध्यापकही पाठवल्याचा उल्लेख या 'शिवभारता'त आहे, पण त्यात कुठेही दादोजी कोंडदेवांचं नाव नाही. संपूर्ण 'शिवभारता'त दादोजींचं नाव नाही. १६३० ते १६४७ या शिवरायांच्या जडणघडणीच्या काळात दादोजी कोंडदेवांचा उल्लेख कुठेही सापडत नाही. 'सभासदाची बखर' ही शिवकालीन एकमेव बखर. तिच्यातही दादोजींचा शिवरायांचे गुरू म्हणून उल्लेख नाही. ज्या बखरींमध्ये असे उल्लेख आहेत त्या शिवाजी महाराजांच्या कालखंडानंतर पुढच्या दीडशे वर्षांत लिहिल्या गेल्या आहेत. एवढंच नव्हे तर शिवकाळातली आदिलशहाची जी फर्मानं आहेत त्यात दादोजी कोंडदेवांचा उल्लेख 'मुतालिक' (कारभारी) असाच आहे.''
'शिवभारत'च्या उपलब्ध दोन प्रतींपैकी स. मा. जोशी यांनी तयार केलेली प्रत १९२७ सालीच प्रसिद्ध झाली होती. म्हणजे हा पुरावा ८० वर्षांपूवीर्च उपलब्ध होता. पण तो दुर्लक्षित करून ३७ वर्षांपूवीर्, दादोजी कोंडदेवांचा शिवरायांचे गुरू म्हणून उल्लेख पाठ्यपुस्तकात करण्यात आला, तेव्हा त्यालाही काही पुरावा असू शकेल. भावनांचं राजकारण करणारे राजकारणी आणि आंदोलक यांनी हा वाद नाहक चिघळवण्यापेक्षा, तो पुरावा गोळा करणंच अधिक शहाणपणाचं ठरणार नाही काय? इतिहासाचं गूढ पुराव्यांनी उकलायचं असतं, अस्मिता आणि भावनांनी नव्हे

Friday 5 June 2009

बाल भारतीने केली चुक मान्य

इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचे गुरू म्हणून असलेला दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख नव्या पाठ्यपुस्तकातून वगळण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर जुन्या पुस्तकातील दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करतानाचे छायाचित्रही 'बालभारती'ने वगळले आहे.
दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते, असा 'ऐतिहासिक' निष्कर्ष क्रीडामंत्री प्रा. वसंत पुरके यांच्या अध्यक्षतेखालील समितीने काढला होता. ह्या निर्णयाला विरोध करीत गजानन मेहेंदळे , निनाद बेडेकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन 'दादोजो कोंडदेव कुलकर्णी' हे शिवरायांचे गुरू होते असे म्हटले होते आणि ह्याला पाठ्य पुस्तकातील पुराव्याचा आधार दिला होता. त्याला उत्तर देताना डॉ. जयसिंगराव पवार , डॉ. वसंतराव मोरे यांनी आवाहन दिले होते की बेडेकर , मेहेंदळे आदी मंडळींनी समकालीन पुरावा सादर करावा, त्यावेळेस बेडेकर ,मेहेंदळे यांच्याकडून एकही पुरावा सादर केला गेला नाही.
आता प्रश्न असा उरतो की जर एकही पुरावा नसेल तर काही इतिहासकारांनी, शाहिरांनी असा खोटा इतिहास का मांडला? बर जर चुक झाली तर हे लोक का स्वीकारत नाहीत की एकही समकालीन पुरावा नाही म्हणून?
ह्या लढ्यासाठी डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. वसंतराव पवार आणि सर्व संघटना ज्यांनी ज्यांनी हा खरा इतिहास समोर आणला त्या सर्वांचे आभार आणि शिवरायांना माफी मागतो की आपला खरा इतिहास लोकांसमोर आणण्यास आम्हाला उशीर झाला.
इतिहासातील अनेक साहित्यांत दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचे पुरावे सापडत नाहीत. शहाजी महाराज आणि जिजामाता यांनीच शिवाजीराजांना सर्व प्रशिक्षण दिले आहे. किंबहुना, शिवाजी महाराजांची खरी प्रेरणा म्हणजे शहाजी महाराज आणि जिजाबाईच आहेत. काही इतिहासकारांनी आजवर अतिशय खोटा आणि अप्रस्तुत असा इतिहास लोकांसमोर मांडला होता; पण वस्तुस्थिती तशी नाही. दादोजी हे उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी होते; पण ते शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचा उल्लेख कुठेही सापडत नाही. दादोजी कोंडदेव यांच्या नावाचा पुरस्कार बंद झाला. आता इतिहासाच्या पुस्तकातूनही त्यांचे नाव वगळले गेले असल्याने, लाल महालात असणारे त्यांचे शिल्पही महापालिकेने काढून टाकावे, अशी आमची मागणी आहे.







Saturday 30 May 2009

शिवस्मारक आदर्शवत व्हावे - संभाजी ब्रिगेड

कोल्हापूर - बहुजन इतिहास संशोधकांची मते घेऊन मुंबईतील शिवस्मारक नवीन पिढीला आदर्श ठरावे, अशी अपेक्षा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष हिंदुराव हुजरे-पाटील व मराठा सेवा संघाचे अध्यक्ष डॉ. राजीव चव्हाण यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्‍त केली.
दरम्यान, मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी समितीचा मीच अध्यक्ष असल्याचा खुलासा काल केल्याने या वादावर पडदा पडला आहे. श्री. पाटील, डॉ. चव्हाण म्हणाले, ""समितीच्या सदस्यपदावरून बाबासाहेब पुरंदरे यांना दूर करावे. त्याचबरोबर मराठी माणसांसाठी काम करण्यापेक्षा भांडणे लावणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रथम आपली मुले मराठी माध्यमाच्या शाळेत घालावीत.'' डॉ. चव्हाण म्हणाले, "जगाला आदर्श ठरेल असे शिवस्मारक मुंबईत व्हावे, ही मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. स्मारकाचा वाद हा पुरोगामी व प्रतिगामी शक्तींमधील आहे. श्री. पुरंदरे यांनी कोणत्याही संशोधनाशिवाय, संदर्भाशिवाय शिवाजी महाराजांविषयी लिहिलेली पुस्तके सुमार दर्जाची व ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाची अवहेलना करणारी आहेत. त्यांनी 2003 मध्ये लिहिलेल्या "राजा शिवछत्रपती' पुस्तकातील लिखाण वाचल्यानंतर जेम्स लेन यांच्या पुस्तकाचे मूळ कोठे आहे, हे समजून येते.''
ते म्हणाले, "श्री. पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखालील पुण्यातील लालमहाल, डेरवण (जि. रत्नागिरी) व सोलापूर येथे उभारलेली शिवसृष्टी वादाच्या भोवऱ्यात आहे. युती शासनाच्या काळात त्यांना पुणे जिल्ह्यातील दिलेल्या 25 एकर जमिनीवर काहीही झालेले नाही. आमचा वाद हा श्री. पुरंदरे किंवा राज ठाकरे यांच्याबद्दल नाही, तर वर्षानुवर्षे चाललेल्या सांस्कृतिक दहशतवादाबाबत आहे. म्हणून बहुजन इतिहास संशोधकांची मते घेऊन मुंबईतील स्मारक नवीन पिढीला आदर्श ठरावे.''

समितीत पुरंदरे नकोत


राज यांच्या टिकेला प्रत्युत्तर


Sunday 24 May 2009

ग्रंथदिंडी, मिरवणुकीने मध्य नागपूर दणाणले



नागपूर - जय शिवाजी व जय जिजाऊचा जयघोष करीत, टाळ-मृदंगाच्या गजरात असंख्य आकर्षक चित्ररथांचा समावेश असलेल्या मिरवणूक व ग्रंथदिंडीने आज मध्य नागपूर दुमदुमले. मराठा साहित्य समंलेनाच्या पूर्वसंध्येला जगदगुरू तुकोबारायांच्या चतुर्थ जन्मशताब्दी वर्षानिमित्त शुक्रवारी काढण्यात आलेल्या या दिंडीत लहानथोरांसह महिलांनीही मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली.
ग्रंथदिंडीची सुरुवात महाराजबाग चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्यापासून झाली. तत्पूर्वी, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष महाकवी सुधाकर गायधनी यांनी डॉ. देशमुख यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पालखीची पूजा केली. यावेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, कवी ज्ञानेश वाकुडकर, विभागीय अध्यक्ष मधुककराव मेहकरे, कॉंग्रेसचे माजी नेते मुकुंदराव पन्नासे, गुरुदेव सेवा मंडळाचे ज्ञानेश्‍वर रक्षक, रमेश बोरकुटे, चंद्रशेखर चांदेकर, संजय शेंडे, प्रदीप शेंडे, डॉ. शांतिदास लुंगे, विजय शिंदे आदी उपस्थित होते.
ग्रंथदिंडी झेंडा चौक (धरमपेठ), लक्ष्मी भवन चौक, शंकरनगर, सिमेंट रोड, रामनगर, गोकुलपेठ, लॉ कॉलेज चौकमार्गे जाऊन डॉ. देशपांडे सभागृहात समारोप झाला. दिंडीत संत तुकाराम, डॉ. आ. ह. साळुंके, मा. म. देशमुख, जैमिनी कडू यांच्यासह अनेक प्रसिद्ध लेखकांचे जवळपास दीडशे ग्रंथ ठेवण्यात आले होते. ग्रंथदिंडीत बाल शिवाजी, जिजाऊ, तुकारामांची वेशभूषा असलेले कलाकार, भजन मंडळ, लेझीम पथकासह सहा आकर्षक चित्ररथांचा समावेश होता. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व अन्य संघटनांचे पदाधिकारी तसेच शाळकरी मुलांचा उत्साह बघण्यासारखा होता.
जगदगुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने पाचवे मराठा साहित्य संमेलन उद्या (ता. 23) पासून डॉ. देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्षपद महाकवी सुधाकर गायधनी भुषवणार असून, उद्‌घाटन पंढरपूरच्या कैकाडी महाराज संस्थानचे अध्यक्ष शिवराज महाराज जाधव यांच्या हस्ते होईल. याप्रसंगी अधीक्षक अभियंता बाळासाहेब लुंगे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू श. नू. पठाण, माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके, पुरुषोत्तम खेडेकर, रेखा खेडेकर, जिल्हाधिकारी प्रवीण दराडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील.उद्‌घाटनानंतर सार्वकालीक संत तुकाराम महाराज आणि साहित्यातील मराठा स्त्री या विषयांवर चर्चासत्र होईल. यात विचारवंत, साहित्यिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर सहभागी होतील. तिसऱ्या सत्रात प्रा. ज्ञानेश वाकुडकर व परभणीचे प्रा. इंद्रजित भालेराव यांच्या मुख्य उपस्थितीत कविसंमेलन होईल.

समाजाला निकोप साहित्याची गरज - ऍड. खेडेकर

नागपूर - साहित्यामध्ये समाजाला बदलविण्याची ताकद आहे. त्यामुळे साहित्यिकांनी समाज घडविणारे निकोप लेखन करावे, असे आवाहन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ऍड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी येथे केले. दोन दिवस चाललेल्या पाचव्या मराठा साहित्य संमेलनाचा आज सिव्हिल लाईन येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात समारोप झाला. यावेळी समारोपीय भाषण करताना त्यांनी वरील मत व्यक्‍त केले.
व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष महाकवी सुधाकर गायधनी, अमेरिकेचे विचारवंत डॉ. थॉम वोल्फ, माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके, बाळासाहेब लुंगे, इतिहास संशोधक प्रा. मा. म. देशमुख, प्रा. जैमिनी कडू, नितीन सरदार, ज्येष्ठ सत्यशोधक व माजी आमदार ऍड. एकनाथराव साळवे, डॉ. साहेबराव खंदारे, सुमतीदेवी धनवटे, राष्ट्रवादी पक्षाचे शहर अध्यक्ष अशोक धवड, आमदार दीनानाथ पडोळे, कवी ज्ञानेश वाकुडकर, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे, पुरुषोत्तम कडू, अनंतदादा चोंदे, विजयकुमार ठुबे, मधुकर मेहकरे आदी उपस्थित होते.
परखड भाषणात ऍड. खेडेकर म्हणाले, जगातील ५८ देशांना तुकाराम माहिती आहे; परंतु आमच्या भारतीयांना तो अजूनपर्यंत समजला नाही. तुकाराम व महात्मा फुले यांच्या विचारांवर अमेरिका व युरोपमध्ये क्रांती होते. तुकारामांचे साहित्य थोर आहे; परंतु फारच कमी घरांमध्ये त्यांचे ग्रंथ आढळतात, ग्रंथ असले तरीही ते आम्ही समजून घेतले नाहीत. त्यांच्या साहित्यावर आज चिंतनाची खरी गरज आहे. संमेलनाच्या निमित्ताने तीन दिवस चिंतन झाले, तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. आंबेडकरांचे विचार जनमानसांपर्यंत पोहोचविले गेले. हीच संमेलनाची खरी फलश्रुती होय.
ऍड. खेडेकर यांनी साहित्यासोबतच आजच्या पत्रकारितेवरही ताशेरे ओढले. पत्रकारांनी भान ठेवून पत्रकारिता करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ब्राह्मण समाज आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही त्यांनी तोंडसुख घेतले. अमेरिका व युरोपसारखे देश संघाला पोसत असल्याची टीका त्यांनी केली. डॉ. वोल्फ यांनी आपल्या भाषणातून नागपूरकरांना महात्मा फुले यांचे विचार समजावून सांगितले. समाजक्रांती घडविणारे म. फुले विदेशातील लोकांना फारसे माहिती नाहीत, याचा खेद वाटतो. फुले सर्वसामान्यांना समजेल, अशा सोप्या व सरळ भाषेत हृदयातील भाषा बोलले. फुलेंना सामाजिक क्रांतीचा जनक संबोधत ते म्हणाले, बहुजनांना ताठ मानेने जगता यावे, यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. मुलींच्या उत्थानासाठी ते लढले. त्यांनी पाहिलेले स्वप्न साकार करण्याची आज आवश्‍यकता आहे.
महाकवी गायधनी अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले, तुकाराम जगाला माहिती झाले आहेत. त्यांच्या साहित्याचे भाषांतर झाले, अभ्यास झाला. फुले, गांधी, आंबेडकरांसारख्या महापुरुषांना विदेशातील अभ्यासक्रमांमध्ये स्थान मिळावे, अशी इच्छा व्यक्‍त केली.
यावेळी प्रा. सुधाकर मोहोड, प्रा. कडू, सुमतीताई धनवटे, माजी आमदार ऍड. एकनाथराव साळवे, प्रा. मा. म. देशमुख, डॉ. वोल्फ, प्रा. पुरके, अशोक धवड यांचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींच्या वतीने प्रा. जैमिनी कडू यांनी सत्काराला उत्तर दिले. संचालन प्रा. मीनाश्री पावडे यांनी केले.
पुरंदरेंना हटवा
मुंबईजवळील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. या समितीच्या अध्यक्षपदी बाबासाहेब पुरंदरे यांच्या निवडीचा प्रस्ताव आहे. त्याचा विरोध करण्याचा प्रस्ताव संमेलनात सर्वानुमते पारित करण्यात आला.

संत तुकाराम जगातील पहिले कर्जमुक्‍तिदाते - प्रा. अशोक राणा

नागपूर - मराठी साहित्यक्षेत्रात उंची गाठलेले संत तुकाराम सत्यनिष्ठ, करुणाप्रिय, निसर्गप्रेमी, स्त्री आणि शेतकऱ्यांचा आदर करणारे होते. तुकारामांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचे कर्ज मुक्‍त केले. म्हणून ते जगातील पहिले कर्जमुक्‍तिदाते असल्याचे प्रतिपादन इतिहास संशोधक व प्रसिद्ध विचारवंत प्रा. अशोक राणा यांनी आज येथे व्यक्‍त केले. सिव्हिल लाइनस्थित डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात पाचव्या अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन झाले. संमेलनाच्या पहिल्या सत्रात "सार्वकालिक संत तुकाराम महाराज' या विषयावर आयोजित चर्चासत्रात अध्यक्षीय भाषण करताना त्यांनी मत व्यक्‍त केले.
चर्चासत्राला गोमंतक मराठी भाषा परिषदेचे अध्यक्ष रामनाथ नाईक प्रमुख वक्‍ते म्हणून उपस्थित होते. विचारपीठावर बाळासाहेब पन्नासे, डॉ. साहेबराव खंदारे, गुरुदेव युवा मंचचे ज्ञानेश्‍वर रक्षक, डॉ. मिलिंद माने, प्रा. बलदेव आडे, डॉ. अशोक येंडे आदी उपस्थित होते.
प्रा. राणा म्हणाले, वारकरी परंपरा नामदेवापासून तुकारामापर्यंतचा प्रवास आहे, हे आम्ही आधी समजून घेतले पाहिजे. तुकारामांना शेतकऱ्यांचा कळवळा होता. सरकारने शेतकऱ्यांना आज कर्जमुक्‍त केले. मात्र, तुकारामांनी साडेतीनशे वर्षांपूर्वीच कर्जदारांची कागदपत्रे इंद्रायणीत बुडवून त्यांना कर्जमुक्‍त केले होते. ते जगातील पहिले कर्जमुक्‍तिदाते आहेत. संत तुकारामांना स्त्रियांबद्दलही आदरभाव होता. त्यांचा स्त्री दाक्षिण्य हा गुण खूप प्रभावित करणारा होता. तुकारामांनी निसर्गावरही खूप प्रेम केले. "वृक्षवल्ली आम्हा सोयरे' या अभंगातून त्यांचे निसर्गप्रेम व्यक्‍त होते.
प्रा. राणा पुढे म्हणाले, गौतमबुद्धांचा त्यांच्यावर फारच प्रभाव होता. बुद्धांचा करुणा हा गुण त्यांना खूप आवडला. तो त्यांनी आचरणातही आणला. मात्र, काहीप्रसंगी त्यांचा कठोरपणाही अभंगातून दिसून येतो. एकीकडे सत्यावर त्यांची अपार निष्ठा होती, तर दुसरीकडे असत्याबद्दल चिडही व्यक्‍त केली. तुकारामांचे व्यवहारकौशल्य इथेच थांबत नाही. संसारासाठी पैसा आवश्‍यक आहे, हे त्यांनी "जोडुनिया धन उत्तर व्यवहारे' या अभंगाद्वारे पटवून सांगितले. त्यांनी देवी-देवतांनाही विरोध केला. कारण अधिक देवी-देवतांमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो, अशी भीती त्यांनी व्यक्‍त केली. युद्ध व सैनिकांना उद्देशून त्यांनी लिहिलेले अभंग त्यांच्या आधुनिक विचारांचे प्रतीक असल्याने ते खऱ्या अर्थाने विश्‍वव्यापी व सार्वकालिक संत असल्याचे त्यांनी सांगितले.
रामनाथ नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकारामांचे महात्म्य सांगून, मराठी भाषेला केवळ महाराष्ट्रापुरती संकुचित ठेवू नये, असा सल्ला दिला. त्यांनी आपल्या भाषणातून गोवावासीयांच्या मनातील खदखद बोलून दाखविली. सोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्‍व हिंदू परिषद या कट्टर हिंदू संघटनेने गोव्याचे फार नुकसान केल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. साहेबराव खंदारे यांनी संत तुकाराम एका भाषेत बंदिस्त होऊ शकत नसल्याचे सांगून त्यांच्या अभंग व साहित्याला वैश्‍विक संबोधले. सूत्रसंचालन माधवी शिंदे व ज्योती मोहरकर यांनी व्यक्‍त केले.

शिव स्मारक समितीच्या अध्यक्ष पदावरून पुरंदरे यांना हटवा: पुरुषोत्तम खेडेकर


Sunday 26 April 2009

आरोपी दयानंद पांडेचा पत्रव्यवहार युनोशी

मालेगाव बॉम्बस्फोट खटला प्रकरणातील आरोपी दयानंद पांडे आणि त्याच्या साथीदारांनी स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीसाठी संयुक्त राष्ट्रसंघाशी म्हणजे यूनोशी पत्रव्यवहार केला होता, अशी धक्कादायक माहिती सूत्रांकडून समजली आहे. त्या स्वतंत्र राष्ट्राचं नाव आर्यावर्त आहे. या नव्या माहितीमुळे मालेगाव बॉम्बस्फोट खटला प्रकरणाचा खुलासा व्हायला मदत होणार आहे.


मालेगाव स्फोटातील आरोपींवर 23 एप्रिल रोजी एक आरोपपत्र दाखल झालं. स्फोटाचा तपास करणार्‍या एटीएसनं हे आरोपपत्र दाखल केलंय. यात काही पत्रं जोडण्यात आलीयत. अयोध्या प्रसाद त्रिपाठी नावाच्या व्यक्तीनं हे पत्र लिहिलंय. हा इसम स्वत:ला आर्यावर्त सरकारचा प्रवक्ता म्हणवतोय. त्यानं यूनोचे सेक्रेटरी जनरल बान की मून यांना लिहिलेलं पत्र एटीएस नं आरोपपत्रात जोडलंय. काश्मीर मधल्या शारदापीठाच्या वतीनं अभिनव भारत या संघटनेची स्थापना करण्यात आलीय असंही या पत्रात म्हटलंय. या शारदापीठाचा शंकराचार्य आपण असल्याचा दयानंद पांडे याचा दावा आहे. पांडे याच्या नेतृत्वाखाली अभिनव भारत ही संघटना चालत होती. त्यात लेफ्टनंट कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंग या व्यक्ती स्वतंत्र सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत होत्या आणि त्यासाठी यूनोपर्यंत त्यांनी पत्रव्यवहार केला होता याचा पुरावा म्हणून ही कागदपत्रं एटीएसनं सादर केलीत. देशातलं सरकार मुस्लिम आणि ख्रिश्चन धार्जिणं आहे. ते आम्हाला मान्य नसून आर्यावर्त या स्वतंत्र हिंदूराष्ट्राची मागण त्यांनी केली होती. तसंच बॉम्बस्फोटानंतर साधवी आणि कर्नल पुरोहित यांना अटक झाल्यानंतर त्यांनी केलेलं काम हे कौतुकास्पद आहे त्यांना आपण साथ द्यायला पाहिजे असं परिपत्रकही त्यांनी अभिनव भारत संघटनेच्या नावाखाली काढलं होतं.

तुका म्हणे आता ! उरलो वादा पुरता


Thursday 19 February 2009

शिवचरित्रातून काय शिकावे? -श्रीमंत कोकाटे

शिवचरित्र हा पदोपदी प्रेरणा देणारा दीपस्तंभ आहे. शिवचरित्रातून आज आपणाला अनेक जीवनमूल्ये शिकता येण्यासारखी आहेत. शिवरायांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून रयतेचे स्वराज्य निर्माण केले. शिवरायांवर अनेक संकटे चालून आली. अफजलखान, शाहिस्तेखान, दिलेरखान, सिद्दी जोहर, औरंगजेब अशा असंख्य शत्रूंशी महाराजांनी मोठ्या धैर्याने मुकाबला केला. म्हणजे शिवाजीमहाराज संकटसमयी रडणारे नव्हते, तर लढणारे होते. आज तरुणांनी संकटसमयी हताश, निराश न होता मोठ्या आत्मविश्‍वासाने संकटांविरुद्ध लढण्याची प्रेरणा शिवचरित्रातून घ्यावी.
शिवाजीराजे प्रयत्नवादी होते; निराशावादी नव्हते. शिवचरित्रातून आज आपण प्रयत्नवाद शिकला पाहिजे. शिवाजीमहाराज निर्व्यसनी होते. त्यांचे सर्व मावळेही (सैनिक) निर्व्यसनी होते. त्यामुळेच शिवाजीराजे यशस्वी झाले. व्यसनाधीन लोक कधीच क्रांती करू शकत नाहीत. शिवरायांच्या जीवनचरित्रातून निर्व्यसनीपणा तरुणांनी शिकावा.
शिवाजीराजे चारित्र्यसंपन्न होते. "शत्रूंच्या स्त्रियांचादेखील त्यांनी आई-बहिणीप्रमाणे आदर केला. ""ज्याला यश पाहिजे त्याने स्त्रीअभिलाषा धरू नये. स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता आहे!'' असे उद्‌गार शिवरायांनी वेळोवेळी काढले. हिरकणीच्या निर्भीडपणाचा, साहसाचा आणि मातृप्रेमाचा सन्मान करताना शिवाजीमहाराज म्हणाले होते, ""ताई, सर्व संकटांवर मात करून बाळाच्या ओढीने घरी जाणारी तुमच्यासारखी निर्भीड आई जोपर्यंत स्वराज्यात आहे, तोपर्यंत ते कोणालाही जिंकता येणार नाही.'' आपली आई राजमाता जिजाऊ मॉंसाहेबांचा प्रत्येक शब्द शिरसावंद्य मानला. आज आपण २१ व्या शतकाची भाषा बोलतो. खरेच, आज स्त्री स्वतंत्र आणि सुरक्षित आहे?
एत्तद्देशीयांचे, जनमानसाचे राज्य
शिवरायांसाठी घाम गाळणारे, लढणारे, प्रसंगी आनंदाने मृत्यूला मिठी मारणारे असंख्य मावळे बहुजनसमाजातून पुढे आले, कारण शिवाजीमहाराज समतावादी होते. शिवरायांचे राज्य रयतेचे, गरिबांचे, एत्तद्देशीयांचे, जनमानसाचे राज्य होते. शिवरायांनी कधी भेदाभेद केला नाही. त्यामुळेच वीर बाजी पासलकर, कान्होजी जेधे, येसाजी कंक, कृष्णाजी बांदल, कावजी कोंढाळकर, जिवाजी महाले, शिवाजी काशीद, तानाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे, बाजीप्रभू देशपांडे, शेलारमामा, बहिर्जी नाईक, हिरोजी भोसले, मदारी मेहतर, सिद्दी इब्राहिम इत्यादी नरवीर शिवरायांसाठी पुढे आले. आज सर्वत्र अविश्‍वासाचे सावट आहे. एकमेकांबद्दल कमालीचे गैरसमज आहेत. अशा काळात शिवरायांची निष्ठावान फळी कशी असेल?
शिवरायांच्याकडे आप-पर भाव नव्हता. नागनाथ महाराला महाराजांनी पाटील केले. रामोशी समाजातील बहिर्जीला गुप्तहेर खात्याचे प्रमुख केले. हंबीरराव मोहिते यांना सरसेनापती केले. जिवाजी महाले या नाभिकाला अंगरक्षक केले. माळी, धनगर, मातंग, महार, कोळी, आग्री, शेणवी, मुसलमान या सर्वांना शिवरायांनी हक्क-अधिकार दिले. आज जातीचे, धर्माचे, पंथाचे, संप्रदायाचे राजकारण झाले आहे. अशा काळात शिवरायांच्या चरित्रातून "समता' शिकावी.
शिवाजी महाराज निःस्वार्थी होते. ""एखाद्या गावच्या पाणवठ्यावरचे पाणी गरजेपेक्षा जास्त घेऊ नका, अन्यथा रयत म्हणेल, की मुघलच बरे. संध्याकाळी झोपताना तेलवातीचे दिवे विझवून झोपा अन्यथा एखादा उंदीर पेटती वात तोंडात धरून धावत सुटेल आणि ती वात कडब्याच्या गंजीला लागून गंजी जळून खाक होईल, मग पावसाळ्यात जनावरांना चारा मिळणार नाही. तेलवातीचे दिवे विझवून झोपा,'' अशी शिवरायांनी प्रजेची काळजी घेतली.
शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालादेखील हात लावू नका, अशा सूचना शिवरायांनी दिल्या. आज मात्र शेतकऱ्यांच्या भाजीचे देठच काय "शेतकरीच' जिवंत ठेवायचा नाही, असे क्रूर राजकारण शिजत आहे. शिवरायांनी शेतकऱ्यांना बी-बियाण्यांचा पुरवठा केला. ओसाड जमिनी ओलिताखाली आणल्या. वतनदारी-मिरासदारी बंद केली. पाणवठे, धरणे, तलाव बांधले. दुष्काळग्रस्तांना मदत केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील, तर शिवरायांचे हे कृषिधोरण अवलंबावे लागेल.
अफजलखान आल्यानंतर शिवाजीमहाराज काही अनुष्ठानाला बसले नाहीत किंवा वारीला, कुंभमेळ्याला किंवा नारायण नागबळी करायला गेले नाहीत, तर "यश मिळविण्यासाठी हातात तलवार घ्यावी लागते, रणांगण गाजवावे लागते, चातुर्य पणाला लावावे लागते,' हे महाराजांनी ओळखले होते. शिवरायांकडून आज वैज्ञानिक दृष्टिकोन शिकावा. शिवाजीराजांची लढाई आदिलशहा, मुघल, सिद्दी, पोर्तुगीज यांच्याविरुद्ध होती; पण ती राजकीय लढाई होती. धार्मिक लढाई नव्हती. याउलट शिवरायांच्या सैन्यात ३५ टक्के सैन्य मुस्लिमांचे होते. त्यांच्या २७ अंगरक्षकांपैकी १० अंगरक्षक मुस्लिम होते. त्यांचे पहिले चित्र रेखाटणारा मीर महंमद हा मुस्लिमच होता. आरमारदलाचे प्रमुख दर्या सारंग व दौलतखान हे मुस्लिमच होते. असे असंख्य मुस्लिम शिवरायांकडे होते. म्हणजे शिवाजीमहाराज धर्मनिरपेक्ष म्हणजेच समता, मानवतावादी होते. शिवचरित्रातून मानवतावाद शिकता येतो.
शिवाजीराजांचे सहा भाषांवर प्रभुत्व होते. जगाच्या स्पर्धेत टिकावयाचे असेल तर बहुभाषक असावे, ही प्रेरणा शिवचरित्रातून मिळते. कोणतीही अनुकूलता नसताना शिवरायांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण केले. शिवरायांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी गाव सोडले. त्यामुळेच ते कोकण, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, जिंजी जिंकू शकले. रेल्वे, विमान, हेलिकॉप्टर, मोबाईल, इंटरनेट, फॅक्‍स, ध्वनिक्षेपक इत्यादी अत्याधुनिक साधने नसताना शिवरायांनी अशक्‍य कार्य शक्‍य केले.
शिवाजीराजांनी झाडांचे रक्षण करण्याचे आवाहन केले. "झाडे सर्वथा न तोडावी. लाकूड-फाटा हवा असेल तर जीर्ण झाड तोडा; पण त्या ठिकाणी नवीन झाड लावा. विनामोबदला शेतकऱ्यांकडून काही घेऊ नका. सागाची, आंब्याची, फळांची झाडे न तोडावीत,' असे आवाहन शिवरायांनी केले होते. आज पर्यावरण धोक्‍यात आले आहे. जागतिक तापमानवाढ हा जगापुढचा गंभीर प्रश्‍न आहे. सजीवसृष्टीचे म्हणजेच पर्यावरणाचे रक्षण करावयाचे असेल तर शिवरायांच्या पर्यावरणदृष्टीची अंमलबजावणी करावी लागेल.
शिवाजी महाराज आज येणार नाहीत. आज आले तरी आपल्या हाती ढाल-तलवार देणार नाहीत, कारण ढाल-तलवारीची लढाई कालबाह्य झाली आहे. इथून पुढचे युद्ध ज्ञानाचे, विचारांचे, संगणक, माहिती तंत्रज्ञानाचे आहे. शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन आपण गाव सोडून न्यायपालिकागड, प्रशासनगड, चित्रपटगड, साहित्यगड, सांस्कृतिकगड, दूरदर्शनगड, शिक्षणगड, धर्मगड, कलावाङ्‌मयगड जिंकले पाहिजेत.

ब्राह्मण समाजाचे उदो उदो करण्यासाठी 'राजा शिवछत्रपति' मालिकेची निर्मिती











Saturday 14 February 2009

हिंदू तालिबानीकरण


प्रेमदिनी 'संस्कृतिरक्षकां'चा यथेच्छ धुमाकूळ


तमाम प्रेमीजनांच्या 'व्हॅलंटाइन डे' सेलिब्रेशनमध्ये मिठाचा खडा पडू नये म्हणून विविध हिंदुत्त्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अगोदरच ताब्यात घेतले असले तरी शनिवारी तथाकथित 'संस्कृतिरक्षकां'नी महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत यथेच्छ धुमाकूळ घातला. पोलिसांनी श्रीराम सेना, शिवसेना, बजरंग दल आदी संघटनांच्या अंदाजे ६०० कार्यर्कत्यांना ताब्यात घेतले होते. तरीही अनेक ठिकाणी प्रेमीयुगुलांना कार्यर्कत्यांची अरेरावी सहन करावी लागली.

पुण्यात मारहाण, जबरदस्तीची लग्ने


खुल्लमखुल्ला 'व्हॅलंटाईन डे' सेलिब्रेट करणाऱ्या प्रेमिकांना शिवसेनेने शनिवारी सकाळी खडकवासला, पेशवेपार्क, सिंहगड येथे सळो की पळो करून सोडले. 'प्रेमकूजन' करणाऱ्या जोडप्यांना 'संस्कृती' शिकवण्यासाठी शिवसैनिकांनी मारहाण केलीच, शिवाय फुलांच्या मुंडावळ्या बांधून, एकमेकांना हार घालायला लावून त्यांची प्रतिकात्मक लग्नेही लावून दिली. पेशवेपार्कमध्ये तर तरुण- तरुणींना शिवसैनिकांनी अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली. त्यांच्या हातात बळजबरीने भगवे झेंडे देण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस उपायुक्त सतीश खंडारे यांनी सांगितले.

मिरजेत तरुणाचे गाढविणीशी लग्न


सज्जड इशारा देऊनही व्हॅलंटाईन डे साजरा करणाऱ्या तरुणाला अद्दल घडवण्यासाठी शिवसैनिकांनी मिरजेत एका तरुणाचे लग्न चक्क गाढविणीशी लावून दिले. शिवसैनिकांनी सांगलीतही विलिंग्डन कॉलेजसमोर निषेधाच्या घोषणा दिल्या.

बहिण-भावालाही सोडले नाही


उज्जैनमधील विक्रम विद्यापीठात गेलेल्या बहिण-भावाला प्रेमीयुगुल समजून बजरंग दलाच्या कार्यर्कत्यांनी अडवले. भावाला मारले, त्याची बॅग फाडली, तर त्याच्या बहिणीला अपमानित करून तिच्याशी गैरवर्तन केले. एका खोलीत होते म्हणून केवळ एक कॉलेजकुमार आणि एका विद्याथीर्नीला अपमानित करणाऱ्या आणि त्यांना पोलिस स्टेशनमध्ये आणणाऱ्या हरयाणातील सब-इन्स्पेक्टरला निलंबनाला सामोरे जावे लागले. त्याची विभागांतर्गत चौकशीही केली जाणार आहे.

Friday 13 February 2009

मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास लोकसभा निवडणुकीत पडसाद उमटतील : सौ. खराडे


आरक्षण न मिळाल्यास बुलेट नव्हे, बॅलेट वापरू -अनंत चोंदे

उस्मानाबाद - शिवजयंतीच्या आधी मराठा समाजाला आरक्षणाची मागणी मान्य केली नाही तर आगामी निवडणुकांत मराठा समाज सत्ता परिवर्तन करून दाखवील. आम्ही आरक्षणासाठी बुलेट नव्हे, तर बॅलेट वापरू, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे यांनी दिला.
उस्मानाबाद जिल्हा मराठा आरक्षण कृती समितीच्या वतीने शुक्रवारी (ता. 13) जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला होता. या वेळी श्री. चोंदे बोलत होते. बार्शी नाक्‍यापासून घोषणा देत निघालेल्या या मोर्चात तरुण कार्यकर्ते व विविध राजकीय पक्षांचे प्रमुख नेते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अग्रभागी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असलेली जीप होती. डॉ. आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळामार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर प्रमुख नेत्यांची भाषणे झाली.श्री. चोंदे म्हणाले, ""मराठा समाज हा जगाचा पोशिंदा आहे; पण बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे आत्महत्या कराव्या लागणाऱ्या शेतकऱ्यांत मराठाच अधिक आहेत. जगाचा पोशिंदा असलेला समाज सुरक्षित राहू शकत नसेल तर त्यांच्यासाठी आरक्षण असलेच पाहिजे. मराठा समाजाने गेल्या 60 वर्षांमध्ये जात म्हणून सरकारकडे काहीच मागितलेले नाही; परंतु आता आरक्षणाची गरज निर्माण झाली आहे. राजकारणामुळेच मराठा समाजाचे तुकडे झाले आहेत; पण यापुढे मराठा समाजातील पुढाऱ्यांनी झेंडा कोणाचाही हाती घेतला तरी सोबत तांडा मात्र मराठ्यांचा ठेवला पाहिजे. सध्या विधानसभेत 113 मराठा आमदार आहेत; पण ते पक्षांचे प्रतिनिधित्व करतात, जातीचे नव्हे. ही बाब लक्षात घेऊन मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी राज्य सरकारने 19 फेब्रुवारी म्हणजे शिवजयंतीपूर्वी मराठा समाजासाठी आरक्षण जाहीर केले नाही तर येत्या निवडणुकांत बुलेट नव्हे, तर बॅलेटचा वापर करून सत्ता बदल केला पाहिजे,'' असे आवाहनही त्यांनी केले.
या वेळी माजी नगराध्यक्ष मधुकर तावडे, जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष अप्पासाहेब पाटील, शिवसेनेचे आमदार प्रा. रवींद्र गायकवाड, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्ष सौ. सिंधूताई मोरे, लोकभारती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. अर्जुन जाधव, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे यांची भाषणे झाली. त्यानंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डी. आर. बनसोड यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले.या मोर्चात मराठा आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष शिवाजीराव साळुंके, प्रा. चंद्रजित जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संपतराव डोके, मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष हनुमंतराव पडवळ, डी. आर. कदम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल खोचरे, माजी जिल्हाप्रमुख भारत इंगळे, राजाभाऊ मुंडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाबा पाटील, सभापती अण्णासाहेब देशमुख, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन बागल, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे मुकुंद सस्ते आदींसह जिल्ह्यातून आलेले तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.
आता लक्ष्य शरद पवारांचे घर
महाराष्ट्रातील आघाडी सरकारची काडीही केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या सल्ल्याशिवाय हालत नाही, हे लक्षात घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा निर्णय लवकर व्हावा, या मागणीसाठी जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्या कधीही केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या घरात स्वतःला कोंडून घेतील, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष अनंत चोंदे यांनी या वेळी दिला.

Monday 2 February 2009

A running thread of deep saffron

The people behind the Malegaon terrorist attack fell into three categories — Sangh parivar cadres, army men and old Savarkarites. The first person to be arrested by the police, Pragya Singh, was a sadhvi and former ABVP leader. A second group of the accused comprised army men, retired or not, related to the Bhonsle Military School (BMS). Major Ramesh Upadhyay, a former defence services officer was arrested first, but the key figure was Lt Col Prasad Purohit, who had approached Upadhyay when he was posted at Nasik as liaison officer. Purohit and Upadhyay imparted military training to young activists — including bomb making — and were instrumental in getting arms and explosives.
Most of the training camps took place in the BMS, which had been directed by Rtd Major P.B. Kulkarni between 1973 and 1988, andwho had been associated with the RSS since 1935. In fact, the Bajrang Dal organised training camps in the BMS (Nagpur) as early as 2001. The five accused mentioned above were all members of Abhinav Bharat, a Pune-based movement initiated by Purohit in June 2006, whose working president was Ramesh Upadhyaya but whose president was none other than Himani Savarkar, V.D. Savarkar’s daughter in law, who also headed the Hindu Mahasabha.
he people, the places and the modus operandi are revealing of the continuity that underlines the Hindu tradition of terror, harking back to V.D. Savarkar. The young, revolutionary Savarkar had created the first Abhinav Bharat Society in 1905. The movement drew its name and its inspiration from Mazzini’s ‘Young Italy’, but was also influenced by Frost Thomas’s Secret Societies of the European Revolution, a book dealing mostly with the Russian nihilists. The movement was dissolved in 1952, but ten years back, just before finishing his term as Hindu Mahasabha president, Savarkar had created the Hindu Rashtra Dal, another militia whose mission was to impart military training to the Hindus in order to fight the Muslims, Gandhi’s followers and the Mahatma himself. This movement cashed in on the work of the same institution — the Bhonsle Military School, started in 1935 by B.S. Moonje, another Nagpur-based Savarkarite, after a European tour which had exposed him to Mussolini’s Balilla movement.
Like the Abhinav Bharat of today, the Hindu Rashtra Dal attracted Hindutva-minded Maharashtrian Brahmins — especially from Poona — who found the RSS insufficiently active. Some of them also had connections to the British Army.
Nathuram Godse and N.D. Apte, the two main architects of Gandhi’s assassination, are cases in point. Godse thought that RSS strategy contented itself with “organisation for the sake of organisation”. The Hindu Rashtra Dal, by contrast, organised training camps where volunteers learnt how to manufacture bombs and use guns from bicycles and cars. The key instructor was N.D. Apte who had served the army as Assistant Technical Recruiting Officer. In this capacity, he could use the War Service Exhibitions — which were intended to attract young Indians to the army — to initiate Hindu Rashtra Dal members into the art of modern arms.
he Hindu Rashtra Dal’s terrorist agenda culminated in the assassination of Gandhi, who had already been a Savarkarite target before — in 1934, they threw a bomb in Poona Municipal Town Hall where Gandhi was making a speech against untouchability.
While today’s Abhinav Bharat belongs to an old tradition harking back to Savarkar and even Tilak, the new element here lies in the implication of one serving officer of the Indian army. Certainly, any institution can have a black sheep. But was he that isolated? He has already named other officers who would have been his more or less passive accomplices and his colleague, Upadhyay, who once headed the Mumbai unit of the BJP’s ex-servicemen cell. The BJP, indeed, inducted ex-army men in large numbers since the 1990s. After the BJP came to power in 1998, two dozens ex-servicemen more joined the party. This inflow of ex-army men may reflect the increasingly communal atmosphere of the institution. In December 2003, a survey by the Centre for the Study of Developing Societies for Tehelka, one of the first among army men — and probably the most comprehensive — showed that 19 per cent of the soldiers interviewed felt that the army practised some religious discrimination — and 24 per cent of the Muslims among them shared this view.
Instead of distancing itself from the Hindu terrorists, as it had done in the 1940s, this time the Sangh Parivar has decided to support the Malegaon accused. Bajrang Dal chief Prakash Sharma declared that “policy makers should be worried if the Hindus were taking to arms because of the government’s skewed approach to war on terror” and admitted that the Bajrang Dal was running training camps too “to boost their morale [the Bajrang Dal’s members]. The country wouldn’t get its Abhinav Bindras if there were no armed training for the youth”.
In a way, the RSS, with the Bajrang Dal, has created a buffer organisation to handle the dirty work that the Sangh was earlier obliged to do itself — work similar to that of the Savarkarite organisations, whether they are called Hindu Rashtra Dal or Abhinav Bharat.